
Mumbai Local Train Latest News : दादर, वांद्रे स्थानकाजवळ पाणी साचले; लोकल 15 ते 30 मिनिटे उशिराने
मुंबई :- मुंबई शहर आणि उपनगरात रविवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळच्या गर्दीच्या वेळी रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या 15 ते 30 मिनिटे उशिराने धावत असल्याने कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय झाली.
रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले
रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. मध्य रेल्वेवरील दादर आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकादरम्यान पाणी भरल्यामुळे लोकलचा वेग मंदावला. यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटे, तर पश्चिम रेल्वेच्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.
लोकलमध्ये गर्दीचा महापूर
रेल्वे सेवा उशिराने धावत असल्याने, एकाच लोकलमध्ये दोन ते तीन लोकलच्या प्रवाशांची गर्दी जमा झाली. यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली. प्रवाशांना चढणेही अवघड झाले. भरगच्च लोकलमध्ये जीव धोक्यात घालून अनेक प्रवाशांना प्रवास करावा लागला.
पावसाचा जोर कायम
दादर, कुर्ला, शीव, घाटकोपर, वांद्रे, अंधेरी आणि बोरिवलीसारख्या महत्त्वाच्या भागात पावसाचा जोर अधिक आहे. रेल्वे मार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने लोकलचा वेग आणखी मंदावला. यामुळे कसारा, टिटवाळा, कर्जत आणि कल्याणसारख्या लांब पल्ल्याच्या लोकल 25 ते 30 मिनिटे, तर विरार, बोरिवली आणि अंधेरीहून येणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.



