Harshvardhan Sapkal : मुंब्राची जीवघेणी गर्दी! हे अपघात नाही, सरकारी बेजबाबदारीचे बळी – सपकाळ यांचा संतप्त आरोप

Harshvardhan Sapkal On Mumbra Railway Accident : रेल्वेमंत्रींची हकालपट्टी करा; मुंबईकरांच्या जीवाशी सरकार खेळतेय – काँग्रेसचा हल्लाबोल
मुंबई | मुंबईच्या लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल प्रवासात पुन्हा एकदा भीषण घटना घडली. ठाण्याजवळील मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला.Harshvardhan Sapkal On Mumbra Railway Accident ही घटना केवळ अपघात नसून सरकारी निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
सपकाळ म्हणाले, “मुंबईकर रोज जीव मुठीत धरून लोकलने प्रवास करतात. पण सरकार आणि रेल्वे प्रशासन त्यांच्या जिवाच्या सुरक्षिततेबाबत पूर्णपणे उदासीन आहे. अपघात होत नाहीत, बळी घेतले जातात – आणि हे बळी सरकारच्या बेजबाबदार धोरणांचे परिणाम आहेत.”
ते पुढे म्हणाले, “भ्रष्टाचार, टेंडरबाजी, इव्हेंटबाजी आणि बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजप सरकारने लोकलच्या वास्तवाकडे लक्ष द्यावे. अकरा वर्षांपासून केवळ गाजर दाखवले जात आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी करावी.”
मुंबईतील दररोजचे 75 लाख प्रवासी ही संख्या काही छोटी नाही, पण त्या तुलनेत सुविधांची पातळी अत्यंत दयनीय आहे. यावर सातत्याने चर्चा, घोषणा आणि दिखावा चालतो – मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. अपघातानंतर काही दिवस घोषणांची गर्दी होते आणि काही आठवड्यांत ती विस्मरणात जाते. यापुढे असे चालणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.


