
Gandhi Jayanti 2025: अन्यायावर न्यायाचा विजय आणि राष्ट्रपित्याच्या विचारांचे स्मरण; 2 ऑक्टोबरला एकाच दिवशी दोन प्रमुख सण.
मुंबई :- आज 2 ऑक्टोबर 2025 रोजी संपूर्ण देशभरात एकाच वेळी दोन महत्त्वाचे आणि प्रेरणादायी दिवस साजरे होत आहेत. एकीकडे विजयादशमी (दसरा) हा असत्यावर सत्याच्या विजयाचा आनंदोत्सव आहे, तर दुसरीकडे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. 2 ऑक्टोबर 1869 रोजी जन्मलेल्या बापूंच्या विचारांनी देशाला स्वातंत्र्य तर मिळवून दिलेच, पण आजही त्यांच्या सिद्धांतांचे महत्त्व टिकून आहे. Gandhi Jayanti 2025
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानला जातो, जो नवीन कार्याची सुरुवात करण्यास प्रेरित करतो. याच शुभ मुहूर्तावर पालक आपल्या मुलांना गांधीजींचे काही महत्त्वपूर्ण सिद्धांत शिकवू शकतात, जे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात मार्गदर्शन करतील: Gandhi Jayanti 2025
1.सत्य हाच धर्म:
महात्मा गांधींचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा सिद्धांत सत्य होता. सत्याच्या मार्गावर कितीही अडचणी आल्या तरी तो मार्ग सोडू नये, असे ते मानत. मुलांना नेहमी खरे बोलण्याचे महत्त्व शिकवा. यामुळे त्यांची प्रामाणिकपणाची सवय वाढेल.
2.अहिंसेची ताकद:
गांधीजी नेहमी अहिंसेचा मार्ग स्वीकारण्याचा आग्रह करत. कोणतीही परिस्थिती असली तरी हिंसा किंवा कोणालाही दुखावून कधीही चांगले होऊ शकत नाही. लहानपणापासून मुलांना शांतता आणि प्रेमाने व्यवहार करण्याची शिकवण देणे आवश्यक आहे. यामुळे त्यांच्यात सहानुभूती आणि संयम वाढतो.
3.साधेपणा ही जीवनशैली:
गांधीजींनी नेहमी सादगीपूर्ण जीवन जगण्याची शिकवण दिली. अनावश्यक खर्च टाळणे आणि पैशांचे योग्य मूल्य ओळखणे महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांना उधळपट्टी न करता पैशाचे महत्त्व समजावून साधेपणाचे महत्त्व शिकवावे. ही सवय त्यांना जबाबदार बनवते.
4 स्वदेशीचा आग्रह:
गांधीजींनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यावर जोर दिला. मुलांना लहान वयातच स्थानिक (लोकल) पातळीवर बनवलेल्या वस्तूंचे महत्त्व समजावून सांगा. यामुळे त्यांच्यात देशभक्तीची आणि राष्ट्रासाठी योगदान देण्याची भावना निर्माण होईल.
विजयादशमीच्या या शुभदिनी, गांधीजींच्या या सिद्धांतांचे अनुसरण करणे हीच त्यांच्या विचारांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.


