मुंबई

Gajanan Kale : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील आरोप प्रत्यारोप वाढले

नवी मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाने राज ठाकरे यांच्यावर भूमिका बदलण्याचा आरोप केला. तर याला प्रतिउत्तर म्हणून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आजपर्यंत कधीही भूमिका न बदलल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचा दुधाने अभिषेक करण्यासाठी वेळ मागितला आहे. अशा पद्धतीचे खोचक पत्र देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपच्या उमेदवारांविरोधात राज्यभर प्रचार सभा घेतल्या होत्या. त्यानंतर आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेत्यांनी यावरून राज ठाकरे यांच्यावर टीका केली. मनसेने देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र वाचा जशास तसे….
प्रति,

आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे, शिल्लक सेना प्रमुख (उबाठा), मुंबई.

विषय – कधीही आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल न केल्याबद्दल आपला दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळणेबाबत.

महोदय,

सस्नेह जय महाराष्ट्र !!!

आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे आपण शिवसेनेची धुरा हातात घेतल्यापासून (माफ करा आत्ताचा आपला उबाठा गट) कधीही सेनेच्या भूमिकेला छेद देऊन राजकारण केलेले नाही. मंत्रीपद, सत्ता, मुख्यमंत्री पद (स्वतःला) यासाठी आपण कधी भाजपा बरोबर युती केली तर कधी युती तोडली. नंतर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आपण सेनेचे पारंपरिक शत्रू असलेले आणि संपूर्णपणे विरोधी विचारधारा असलेले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (म्हणजे आत्ताचा शरद पवार गट) बरोबर आघाडी केलीत मात्र सेनेला मुख्यमंत्री पद मिळवून दिलेच. हा भाग वेगळा की आपण एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होतात पण माफ करा आम्ही विसरलोच की आपणही एक शिवसैनिकच आहात. हे सगळे आपण केलेत यास कुठेही यू टर्न, तडजोडीचे, सत्तापिपासू, स्वार्थी, मतलबी राजकारण अथवा भूमिका बदलणे असे म्हणता येत नाही. याबद्दल आपले करावे तितके कौतुक कमीच आहे…!!!

आपल्यासारखा इतका सच्चा, प्रामाणिक, तत्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा आणि सत्तेचा अजिबात मोह नसलेला व्यक्ती आजच्या राजकारणातच काय तर या पृथ्वीतलावर सापडणे दुर्मिळ. याच आपल्या गुणांसाठी, तुमचे महाराष्ट्रावर असलेले ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता म्हणून आम्ही समस्त महाराष्ट्राच्यावतीने आपला दुधाने अभिषेक करू इच्छितो (जसा नायक सिनेमात अनिल कपूरचा केला गेला होता) तरी आपण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना यासाठी आपली वेळ द्यावी, ही नम्र विनंती…!!!

आपला नम्र,

गजानन काळे | महाराष्ट्र सैनिक

टीप – निवडणुकांच्या आपल्या व्यस्त दिनक्रमात आपण वेळ न देऊ शकल्यास आपल्या फोटोला आम्ही दुधाने अभिषेक घालून समस्त महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करुच …!!!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0