
Mangal Prabhat Lodha : रचनेच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त निर्णय; मंगलप्रभात लोढांचा ‘भारत मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा’ चा इशारा
मुंबई :- महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ हे गीत पूर्ण स्वरूपात गाण्याचा निर्णय घेतला आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या या गीताच्या रचनेला 31 ऑक्टोबर 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा आदेश जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत सरकारी आदेशानुसार फक्त पहिले दोन श्लोक गायले जात होते, पण आता संपूर्ण गीत गायले जाईल.
या निर्णयावर समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी आक्षेप घेतला असून, “वंदे मातरम बंधनकारक करणं योग्य नाही,” असे मत व्यक्त केले आहे. आझमी यांच्या या भूमिकेनंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मंगलप्रभात लोढा यांचा हल्लाबोल
भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अबू आझमी यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत निशाणा साधला.”अबू आझमींना कळलं पाहिजे हा पाकिस्तान नाही, तर भारत आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा भारत आहे, देवेंद्रजींचा महाराष्ट्र आहे. भारत मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा,” असे लोढा यांनी सुनावले.लोढा यांनी अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.त्यांनी आझमी यांच्या मतदारसंघातील लोकांना आवाहन केले की, “त्यांच्या घरी जा आणि वंदे मातरम दिन आमच्यासोबत साजरा करा.”
‘सामोरे या, नाहीतर आम्ही तुमच्या घरी येऊ’
वंदे मातरम हे स्वातंत्र्याचे गीत आणि मंत्र असल्याचे सांगत लोढा यांनी पुढे इशारा दिला. “कोणाची हिंमत असेल तर समोर यावं, नाहीतर आमचे कार्यकर्ते तुमच्या घरासमोर येत वंदे मातरमचे गायन करतील,” असे लोढा म्हणाले.
नवनाथ बन यांचा ‘देश सोडण्याचा’ सल्ला
भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनीही अबू आझमींवर जोरदार टीका केली.
“भारतात राहयचं असेल तर वंदे मातरम्, भारत माता की जय म्हणाव लागेल. भारत माता, आणि वंदे भारतची ॲलर्जी असेल तर त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन राहावे,” असे ते म्हणाले.
“वेदांपेक्षा आम्हाल वंदे मातरम् प्रिय आहे. अबू आझमींना द्वेष असेल तर त्यांनी देश सोडून जावा,” अशा शब्दांत नवनाथ बन यांनी आझमींवर निशाणा साधला.



