Mira Bhayandar Bribe News : 16 हजारांची लाच घेताना मीरा भाईंदरचे 2 पालिका कर्मचारी रंगेहाथ अटकेत! – अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याची धमकी देणे पडले महागात

•पालिकेच्या शासकीय गाडीतून लाच स्वीकारायला आले; लिपिक आणि सफाई कामगारासह एका खाजगी व्यक्तीला ‘ACB’ने केली अटक, काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मीरा भाईंदर :- अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची धमकी देऊन एका महिलेकडे 16 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
मीरा भाईंदर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 6 मधील अतिक्रमण विभागातील लिपिक राजेश तुकाराम कदम, सफाई कामगार सुहास किणी आणि खाजगी व्यक्ती संजय भोला साहू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या तिघांनी काशिमीरा येथील काजूपाडा भागात असलेल्या एका महिलेच्या बांधकामावरील अतिक्रमण विरोधी कारवाई टाळण्यासाठी तिच्याकडे सुरुवातीला 25 हजार रुपयांची मागणी केली होती.यात तडजोड झाल्यानंतर अखेरीस 16 हजार रुपयांवर हा व्यवहार ठरवण्यात आला.लाचेची ही रक्कम स्वीकारण्यासाठी हे तिघे बुधवारी शासकीय गाडीतून आले होते. त्याच वेळी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या तिघांनाही लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन मोरे, शर्मिला पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.


