Eknath Khadse : ‘ती रेव्ह पार्टी नव्हती, राजकारणाचा डाव होता’; जावयाला जामीन मिळाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

•दीड महिन्यानंतर प्रांजल खेवलकर यांना दिलासा, खडसे परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप
पुणे :- पुण्यातील खराडी येथे झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी दीड महिन्यांपूर्वी अटकेत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. या जामीनानंतर आमदार खडसे यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर आणि या संपूर्ण प्रकरणामागील राजकारणावर जोरदार टीका केली आहे.
‘खडसे परिवाराला बदनाम करण्याचा डाव’
जावयाला जामीन मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले की, “पुणे पोलिसांनी प्रांजल यांच्यावर लावलेले आरोप चुकीचे होते, हे मी तेव्हाही सांगितले होते. मुळात ती रेव्ह पार्टी नव्हती, तर एका घरातली साधी पार्टी होती.” ते पुढे म्हणाले, “प्रांजल यांनी कोणताही अंमली पदार्थ सेवन केला नाही किंवा बाळगलाही नाही. असे असताना त्यांना कोणाच्या सांगण्यावरून अडकविण्यात आले, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.”
हा खडसे परिवाराला बदनाम करण्याचा राजकारणाचा डाव आहे आणि महाराष्ट्राचे राजकारण किती खालच्या थरावर गेले आहे, याचे हे उत्तम उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
खडसे यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “पोलिसांनी प्रांजल यांना पहिल्या क्रमांकाचे गुन्हेगार ठरविले; कारण त्यांच्यावर आधीच खूप गुन्हे दाखल आहेत, असे म्हटले. पण प्रत्यक्षात, पोलिसांनी नंतर प्रांजल यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याची कबुली दिली.”
नेमके प्रकरण काय?
काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी खराडी परिसरात छापा टाकून प्रांजल खेवलकर यांच्यासह सात पुरुष आणि दोन महिलांना अटक केली होती. त्यावेळी कोकेन, गांजा सदृश पदार्थ, हुक्का पात्र आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याशिवाय, प्रांजल खेवलकर यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात एका महिलेचे विनासंमती छायाचित्रे काढल्याबद्दल माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आपल्या जावयाला अटक होण्याच्या दिवशीच एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर हनी ट्रॅप प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केली होती. जावयाच्या अटकेमुळे खडसे यांना टीकेची आयती संधी मिळाली होती. आता जामीन मिळाल्यानंतर खडसे यांनी पुन्हा एकदा राजकीय टीका सुरू केली आहे.



