Mumbai Drugs News : मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून तब्बल 50 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

•नशा मुक्त मुंबई अभियान’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून (8 एप्रिल) 130 गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले पन्नास कोटींचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले
मुंबई :- नशा मुक्त मुंबई अभियानांतर्गत पोलिसांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी छापे टाकून तिथून विविध प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या जप्त केलेल्या अंमली पदार्थांची मुंबई पोलिसांच्या माध्यमातून विल्हेवाट लावण्यात येतं असून तब्बल पन्नास कोटी 30 लाख अंमली पदार्थ पोलिसांच्या माध्यमातून नष्ट करण्यात आले. मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून एमआयडीसी तळोजा पनवेल येथे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
राज्य सरकारच्या 100 दिवसाच्या कृती आराखडा संकल्पनेतून मुंबई आयुक्तालयाच्या अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष मुंबई यांनी शंभर दिवसाच्या या कारवाईमध्ये तब्बल 50 कोटी 30 लाख किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. यामध्ये 130 न्यायप्रविष्ठ गुन्ह्यातील 530 किलो वजनाचे 4433 कोडीन मिश्रित बॉटल असलेला मुद्देमाल पोलिसांनी तळोज्याच्या वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड येथे बंदिस्त भट्टी जाळून नाश केला आहे.
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर यांच्या मान्यतेने तसेच विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई देवेन भारती यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम,पोलीस सह आयुक्त (का.व सु.) सत्य नारायण यांचे सहकार्याने घटकस्तरीय ड्रग डिस्पोजल कमिटीचे अध्यक्ष मा. पोलीस सह. आयुक्त (का. व सु.) सत्य नारायण व सदस्य पोलीस उप आयुक्त (प्रतिबंधक) अमोघ गावकर (अतिरिक्त कार्यभार अपर पोलीस आयुक्त, गुन्हे), पोलीस उप आयुक्त (अंपविकक्ष) शाम घुगे तसेच रासायनिक तज्ञ, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कलीना यांचे प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक भांडारगृह बाळासाहेब शिंदे, सहाय्यक फौजदार शेडगे,निकम, पोलीस हवालदार चव्हाण, महिला पोलीस हवालदार नाईक, जाधव यांनी सदर अंमली पदार्थाची नाश प्रक्रिया करण्यासंबंधीची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे.



