•जिल्ह्यातील 55 गटांमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा; अर्चना पाटील, धनंजय सावंत आणि तीर्थराज घाडगेंचा विजयाचा गुलाल; महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत
धाराशिव | राज्यातील मिनी मंत्रालयाची निवडणूक समजल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल आज जाहीर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या लढाईचा फैसला आज मतदारांनी केला. जिल्ह्यात काही ठिकाणी महायुतीने मुसंडी मारली असली, तर काही महत्त्वाच्या गटांत ठाकरे गटाने आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा आणि निकालाचा कल
धाराशिव जिल्ह्यातील 55 जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी झालेल्या या निवडणुकीत दिग्गजांच्या नातलगांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी ‘तेर’ जिल्हा परिषद गटातून विजय मिळवत भाजपचा झेंडा फडकवला आहे. तर तानाजी सावंत यांच्या भूम-परंडा-वाशी या बालेकिल्ल्यात शिवसेनेने (शिंदे गट) आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषद: प्रमुख विजयी उमेदवारांची नावे
तेर जिल्हा परिषद गट: अर्चना राणा जगजितसिंह पाटील (भाजपा) – विजयी
जवळा जिल्हा परिषद गट: धनंजय सावंत (शिवसेना – शिंदे गट) – विजयी
ढोकी जिल्हा परिषद गट: तीर्थराज घाडगे (शिवसेना – ठाकरे गट) – विजयी
शेळगाव (परांडा) गट: अमर मोरे (शिवसेना – शिंदे गट) – विजयी
उरण नवघर गट: प्रेरणा पाटील (शिवसेना – ठाकरे गट) – विजयी
आलूर गट: आप्पासाहेब पाटील (शिवसेना – शिंदे गट) – विजयी
पारगाव जिल्हा परिषद गट: स्वाती तळेकर (शिवसेना – शिंदे गट) – विजयी
खामसवाडी गट (कळंब): विश्वास कोकणे (भाजपा) – विजयी
ठाकरे गटाचा ‘एका’ मताने थरारक विजय
या निवडणुकीत ढोकी पंचायत समिती गणाने सर्वांचे लक्ष वेधले होते. येथे ठाकरे गटाचे अमर समुद्रे यांनी भाजपच्या निहाल काजी यांचा अवघ्या 1 मताने पराभव केला. समुद्रे यांना 3187 मते मिळाली, तर काजी यांना 3186 मतांवर समाधान मानावे लागले. या निकालाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे.
तानाजी सावंतांचा दबदबा आणि आगामी समीकरणे
माजी मंत्री तानाजी सावंत यांनी भूम-परंडा भागात आपली पकड मजबूत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने या भागात मोठी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, उस्मानाबाद (धाराशिव) आणि तुळजापूर भागात ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांच्यात संमिश्र यश पाहायला मिळाले आहे. 2017 मध्ये राष्ट्रवादीने 26 जागांसह मिळवलेले वर्चस्व यंदा विभागले गेल्याचे चित्र आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…