Devendra Fadnavis : हत्तीणी माधुरीचा वाद सर्वोच्च न्यायालयात; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे तोडगा

•लोकांच्या भावनांचा आदर करत सरकार पुनरावलोकन याचिका दाखल करणार; वंताराची सकारात्मक भूमिका
कोल्हापूर :- कोल्हापूरमधील हत्तीणी माधुरीवरून सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असतानाच, या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीम वंतारा’सोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. माधुरीला पुन्हा नंदनी मठामध्ये पाठवण्यासाठी सरकार पुनरावलोकन याचिका दाखल करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, ‘टीम वंतारा’ने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी माधुरीची कस्टडी पुन्हा नंदनी मठाकडे देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, कोल्हापूरमधील नंदनी भागातच वन विभागाच्या जागेवर माधुरीसाठी एक पुनर्वसन केंद्र (rehabilitation center) उभारण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे. वंताराने हे देखील स्पष्ट केले की, माधुरीला जामनगरला पाठवणे हा त्यांचा स्वतःचा निर्णय नव्हता, तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आला होता.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, माधुरी गेल्या ३४ वर्षांपासून नंदनी मठाच्या परंपरा आणि लोकांच्या जीवनाचा एक भाग बनली आहे. तिच्यासोबत लोकांचा भावनिक आणि धार्मिक संबंध आहे, ज्याचा सरकार पूर्ण आदर करते. याच कारणास्तव सरकार या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करेल. सरकारने मठालाही त्यांच्या याचिकेत सरकारला एक पक्षकार बनवण्यास सांगितले आहे.
या प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. माधुरीची योग्य काळजी घेण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांचे एक विशेष पथक तयार केले जाईल आणि गरज पडल्यास रेस्क्यू सेंटरसारख्या सुविधाही पुरवल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
वंताराने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा माधुरी त्यांच्याकडे आली, तेव्हा तिच्या पायाला जुन्या गंभीर जखमा होत्या. तसेच नख वाढलेले, फोड, सूज, फ्रॅक्चर आणि संधिवात (arthritis) अशा समस्या आढळून आल्या होत्या. याच कारणामुळे मुंबई उच्च न्यायालयाने १६ जुलै २०२५ रोजी आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै रोजी तिला जामनगर येथील केंद्रात हलवण्याचे आदेश दिले होते. वंताराने लोकांच्या भावना आणि परंपरांचा आदर करत, न्यायालयाच्या परवानगीनंतर माधुरीच्या सुरक्षित परत येण्यासाठी तांत्रिक आणि वैद्यकीय मदत देण्याची तयारी दर्शवली आहे.



