महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना: तेलंगणात तणाव, महाराष्ट्रात संताप! प्रकाश आंबेडकरांचा संघावर हल्लाबोल, तर भुजबळही आक्रमक

Statue of Mahatma Jyotiba Phule Vandalised in Telangana: संगारेड्डी जिल्ह्यातील घटनेने सामाजिक समतेवर घाला; दोषींना कठोर शासनाची मागणी; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींना घेरले
हैदराबाद/मुंबई | तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात काही समाजकंटकांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करून तो हलवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस उपस्थित असतानाही समाजकंटकांनी हे धाडस केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेचे पडसाद आता संपूर्ण देशभरात उमटत असून महाराष्ट्रातील नेत्यांनी तेलंगणा सरकार आणि विचारधारेवर सडकून टीका केली आहे. Mahatma Jyotiba Phule Vandalised
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तेल्लापूर येथील महात्मा फुलेंचा पुतळा विद्रुप करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत समाजकंटकांना तेथून पिटाळून लावले, मात्र तोपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. संतापलेल्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी करत निषेध व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात अद्यापही तणावपूर्ण शांतता आहे.
प्रकाश आंबेडकरांचा थेट संघावर निशाणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) गंभीर आरोप केले आहेत. “हा हल्ला केवळ महात्मा फुलेंवर नाही, तर दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला आहे. संघाला फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेचा तिरस्कार असून त्यांचे केवळ मनुवाद आणि ब्राह्मणवादावर प्रेम आहे,” अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना जाब विचारताना, “तुम्ही हात बांधून गप्प का बसला आहात?” असा सवालही आंबेडकरांनी विचारला.
छगन भुजबळांचे अमित शहांना पत्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी या प्रकरणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे धाव घेतली आहे. “महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर हल्ला म्हणजे सामाजिक समतेवर झालेला घाला आहे,” असे मत व्यक्त करत त्यांनी दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तेलंगणात वारंवार सामाजिक विचारांवर हल्ले होत असल्याचा आरोप करत भुजबळांनी तीव्र संताप व्यक्त केला.
तेलंगणा सरकारपुढील आव्हान राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी अपयशी ठरत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. समाजकंटकांना कोणाचे पाठबळ आहे, याचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



