
Aaditya Thackeray On Maharashtra Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचं विरोधकांविरोधात विधानभवनाबाहेर आंदोलन
मुंबई : हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मागील काही दिवसांपासून राज्यात उफाळलेली राजकीय उलथापालथ अद्याप थांबलेली नाही. राज्य सरकारने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्रिभाषा सूत्रावरील दोन्ही निर्णय मागे घेतले असले, तरी विरोधकांचा रोष ओसरलेला नाही. आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात हेच चित्र पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी गटाने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत विरोधकांवर हल्लाबोल केला. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर निशाणा साधण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्याच्या व्यापक हितासाठी घेतल्याचे मतही या आंदोलनात मांडण्यात आले.
दुसरीकडे, विरोधक सरकारच्या यू-टर्नवर संतापलेले असून, हिंदी सक्तीचा विषय सभागृहात गाजण्याची शक्यता आहे. याशिवाय शक्तिपीठ महामार्गाचा विरोध, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या रकमेतील वाढ, समृद्धी महामार्गाची दुरवस्था आणि महागाईचे वाढते चटके या मुद्द्यांवरून देखील सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांची तयारी आहे.
या पार्श्वभूमीवर आजपासून 18 जुलैपर्यंत चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उठण्याची शक्यता असून, सभागृहात वातावरण तापलेले राहील, हे निश्चित आहे.



