Dattatray Bharane : ‘70 लाख एकरवरील पिकांचे नुकसान’; अतिवृष्टीवरून कृषीमंत्र्यांची मोठी माहिती, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत

Dattatray Bharane : ‘हे सरकार तुमच्या पाठीशी’; निकषांच्या पलिकडे जाऊन मदत करणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन
मुंबई :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून, शेतजमीन अक्षरशः खरडून गेली आहे. या पार्श्वभूमीवर आज (25 सप्टेंबर) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे Dattatray Bharane यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तब्बल 70 लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले असून, सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निकषांच्याही पलिकडे जाऊन निर्णय घेणार आहे.
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा कहर
कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले की, यंदा विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने मोठा हाहाकार उडवला आहे. नद्या आणि ओढ्याकाठची शेती पार वाहून गेली आहे. पिकांचे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे, तर अनेक घरांची पडझड झाली आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून, सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांनी दिली.
दिवाळीपूर्वी मिळणार मदत
कृषीमंत्र्यांनी सांगितले की, सध्या पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर ज्या भागांत पंचनामे पूर्ण झाले नाहीत, त्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निकषांनुसार मदत केली जाईल असे सांगितले, परंतु “हे सरकार शेतकऱ्यांचे आहे आणि ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,” असेही स्पष्ट केले. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होऊन शेतकऱ्यांच्या हिताचा चांगला निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



