मुंबई

Indu Mill : इंदू मिल स्मारकाचे 50 टक्के काम पूर्ण! – पुढील महापरिनिर्वाण दिनी स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस

•100 फूट पायथा आणि 350 फूट उंच पुतळ्याचे आव्हान; प्रवेशद्वार, संशोधन केंद्र, वाचनालय यांचे स्ट्रक्चरल काम पूर्ण; 6000 टन पोलाद लागणार

मुंबई/चैत्यभूमी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. इंदू मिल (Indu Mill) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे 50 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम नियोजित पद्धतीने सुरळीत पार पडल्यास पुढील महापरिनिर्वाण दिनी (6 डिसेंबर 2025) या भव्य स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी चैत्यभूमीवर दाखल होत बाबासाहेबांना आदरांजली वाहिली, त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पुतळ्याची उभारणी हे मोठे आव्हान

स्मारक समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुतळा संघर्ष समितीच्या मागणीनंतर नुकतीच सरकारने नव्याने समन्वय समिती स्थापन केली आहे. या भव्य प्रकल्पातील मुख्य आकर्षण आणि मोठे आव्हान म्हणजे पुतळ्याची उभारणी आहे.

पुतळ्याची रचना: हे स्मारक 100 फूट उंचीचा पायथा आणि 350 फूट उंच पुतळा असे भव्य असणार आहे.

सध्याची प्रगती: स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह आणि वाहनतळ या सर्व इमारतींची स्ट्रक्चरल कामे 100 टक्के पूर्ण झाली आहेत. सध्या या इमारतींची अंतर्गत सजावट आणि बाह्य विकासाची कामे सुरू आहेत.

पोलाद आणि कास्टिंग: पुतळ्याच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण झाले असून, पुतळ्याच्या आर्मेचर फॅब्रिकेशनसाठी सहा हजार टन पोलाद लागणार आहे. त्यापैकी 1400 टन पोलाद आले असून, 650 टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. पुतळ्याच्या दोन्ही बुटांच्या पॅनेल कास्टिंगचे कामही पूर्ण झाले आहे, ज्यात शिलाई आणि लेस हुबेहूब दिसत आहे.

बाबासाहेबांची दूरदृष्टी

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक दृष्टीचे आणि योगदानाचे महत्त्व सांगितले. त्यांनी म्हटले की, बाबासाहेबांनी विषमतेला आपली शक्ती बनवून ज्ञान संपादन केले आणि जात-धर्म बाजूला ठेवून देशाला संविधान दिले, ज्यामुळे देश प्रगती करू शकला.

पंतप्रधान मोदी नेहमी म्हणतात की, कोणत्याही ग्रंथापेक्षा संविधान सर्वोत्तम आहे. बाबासाहेबांची वैचारिक दृष्टी किती मोठी होती, याचे उदाहरण देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे वीजमंत्री असताना देशासाठी राष्ट्रीय ग्रीड (National Grid) तयार केले. वीज एका भागातून दुसऱ्या भागात वाहून नेणे शक्य व्हावे, ही गोष्ट त्यावेळी अमेरिकेसारख्या प्रगत देशालाही लक्षात आली नव्हती, पण बाबासाहेबांच्या लक्षात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0