Ranveer Singh: लॉरेन्स बिश्नोई टोळीचा रणवीर सिंगला 1 कोटींचा ‘थ्रेट कॉल’! हॅरी बॉक्सरचा आवाज ओळखला; इंटरपोलच्या मदतीने तपासाची चक्रे फिरली

Ranveer Singh Threat Call : रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबारानंतर रणवीरची सुरक्षा वाढवली; व्हर्च्युअल नेटवर्कच्या माध्यमातून परदेशातून पाठवली व्हॉइस नोट
मुंबई :- बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग Ranveer Singh Threat Call याला 1 कोटी रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीमागे बिश्नोई टोळीचा मुख्य हस्तक हॅरी बॉक्सर असल्याचा दाट संशय मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने व्यक्त केला आहे. अभिनेत्याच्या मॅनेजरला पाठवण्यात आलेल्या व्हॉट्सॲप व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी हुबेहूब जुळत असल्याचे प्राथमिक तांत्रिक विश्लेषणात समोर आले आहे. मात्र, या निष्कर्षाला अधिकृत पुष्टी देण्यासाठी पोलीस आता फॉरेन्सिक पुराव्यांची मदत घेत आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर लगेचच ही धमकी मिळाल्याने पोलिसांनी या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. तपासात असे समोर आले आहे की, हा धमकीचा संदेश पाठवण्यासाठी VPN (Virtual Private Network) चा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे त्याचे डिजिटल लोकेशन परदेशात दिसत आहे. या नेटवर्कचे मूळ शोधण्यासाठी आणि ही धमकी नेमकी कोणत्या देशातून आली आहे हे ओळखण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने आता इंटरपोलची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
केवळ रणवीर सिंगच नाही, तर रोहित शर्मा आणि अभिनेता आयुष शर्मा यांनाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली गाडी पुण्यातील एका रहिवाशाकडून 30 हजार रुपयांना खरेदी करून मुंबईत आणण्यात आली होती. आदित्य गायकी आणि समर्थ पोमाजी या आरोपींनी ही गाडी जुहूत उभी केली होती, ज्याचा वापर करून शुभम लोणकरच्या आदेशानुसार शूटरने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
धमकीचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांनी रणवीर सिंगच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली आहे. गुन्हे शाखेने तीन दिवसांपूर्वीच त्याच्या मॅनेजरचा सविस्तर जबाब नोंदवला असून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. बिश्नोई टोळीने बॉलिवूडमधील बड्या चेहऱ्यांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरूच ठेवल्याने सध्या संपूर्ण सिनेसृष्टीत दहशतीचे वातावरण आहे. आता इंटरपोलच्या मदतीने परदेशातील या टोळीच्या हस्तकांपर्यंत पोलीस पोहोचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


