मुंबई

CM Devendra Fadnavis : ‘महादेवी’ हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

CM Devendra Fadnavis On Nandini : कोल्हापूरकरांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री सकारात्मक; कबुतरखान्याच्या प्रश्नावरही तोडगा काढणार!

मुंबई :- कोल्हापूरच्या नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातून नेलेली हत्तीण ‘महादेवी’ला परत आणण्यासाठी कोल्हापूरकर जोरदार आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जनतेकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन, राज्य सरकार आता ‘महादेवी’ला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नांदणीची हत्तीण आणि मुंबईतील कबुतरखान्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही उद्या तातडीची बैठक बोलावली आहे. या दोन्ही घटनांमध्ये न्यायालयाचे आदेश आहेत, सरकारने कोणताही आदेश दिलेला नाही. मात्र, आम्ही जनभावना लक्षात घेतली पाहिजे. यातून काय मार्ग काढता येईल, यावर आम्ही संबंधित लोकांशी चर्चा करणार आहोत. दोन्ही विषयांवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

याचवेळी ‘वनतारा’ (रिलायन्स समूहाचा गुजरातमधील वन्यजीव प्रकल्प) ने ‘महादेवी’ सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जर वन्यजीव विभाग आणि जैन मठाने न्यायालयातून संमती मिळवली, तर हत्तीणीला परत पाठवले जाईल.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी कबुतरखान्याच्या प्रश्नावरही भाष्य केले. दादरमधील कबुतरखाना न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आला आहे. मात्र, यावरही तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. एकाच वेळी दोन संवेदनशील विषयांवर तोडगा काढण्यासाठी सरकार आता सक्रिय झाले आहे.

‘महादेवी’ला परत आणण्यासाठी रविवारी कोल्हापुरात मोठे आंदोलन झाले. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कोल्हापूरकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आता उद्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

vivek

Recent Posts