Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! माजी महानगरप्रमुख राजू वैद्य यांचा भाजपमध्ये प्रवेश

Chhatrapati Sambhaji Nagar Political News : “पक्षात हिंदुत्ववादी भूमिका मांडणे आता अशक्य”; रशीद मामूंच्या प्रवेशावरून ठाकरे गटात उभी फूट
छत्रपती संभाजीनगर | आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. पक्षाचे माजी महानगरप्रमुख राजू उर्फ रेणुकादास वैद्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबईत झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. “केवळ कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडता यावी, याच उद्देशाने मी भाजपची वाट धरली आहे,” असा दावा वैद्य यांनी यावेळी केला.



हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घरचा आहेर
राजू वैद्य यांनी पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सडकून टीका केली. ते म्हणाले,”महाविद्यालयीन जीवनापासून आम्ही केवळ हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम केले आहे. मात्र, सध्या ज्या पक्षात (ठाकरे गट) मी होतो, तिथे हिंदुत्वाची भूमिका मांडणे आता शक्य राहिलेले नाही. शहराच्या विकासासाठी आणि विचारांशी तडजोड न करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.”
अंबादास दानवेंची सावध प्रतिक्रिया; प्रवेश ‘अनाकलनीय’
राजू वैद्य यांच्या पक्षांतरामुळे खळबळ उडाली असतानाच, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर नाराजी व्यक्त केली. “राजू वैद्य हे एक सक्षम आणि पक्षाने सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारे कार्यकर्ते होते. दोन दिवसांपूर्वीपर्यंत ते आमच्यासोबत होते, अचानक काय घडले हे समजत नाही. त्यांचा हा निर्णय अनाकलनीय आहे,” असे दानवे म्हणाले. तसेच, अंतर्गत मतभेदांवर सार्वजनिकरीत्या टीका करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सुनावले.
रशीद मामूंच्या एन्ट्रीने ठिणगी! खैरे विरुद्ध दानवे वाद चव्हाट्यावर
शहरातील ठाकरे गटात सध्या प्रचंड अंतर्गत कलह पाहायला मिळत आहे.काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर प्रवेश केला, मात्र या प्रवेशाला ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “रशीद मामूंना कोणत्याही परिस्थितीत तिकीट मिळू देणार नाही,” अशी आक्रमक भूमिका खैरेंनी घेतल्यामुळे आणि त्यांच्यातील वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पक्षात दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. याच नाराजीचा फायदा उचलत भाजपमध्ये गेलेल्या राजू वैद्य यांनीही हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत ठाकरे गटाची कोंडी केली आहे.



