Mumbai News : मुंबईच्या सत्तेसाठी ‘किल्लेबंदी’! भाजप नगरसेवकांना ‘नो एन्ट्री’ तर हॉटेल ताजमध्ये शिंदे गटाचे ‘हॉटेल पॉलिटिक्स’

• महापौर आरक्षणापूर्वीच हालचालींना वेग; नगरसेवकांची फूट रोखण्यासाठी पक्षांकडून फिल्डिंग, सत्तेचा दावा करण्याची तयारी
मुंबई | मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचे गणित जुळवण्यासाठी आता राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील आठवडाभर मुंबईबाहेर न पडण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. आरक्षण जाहीर होताच भाजप सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून ही ‘किल्लेबंदी’ करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलमध्ये ‘हॉटेल पॉलिटिक्स’ला धार चढली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्वाचित नगरसेवकांचा स्वतंत्र ‘गट’ स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कायदेशीर पेच टाळण्यासाठी आणि नगरसेवकांची संभाव्य फूट रोखण्यासाठी आजच गट नेत्याची निवड करून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या शर्यतीत यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांसारख्या अनुभवी व तरुण चेहऱ्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नगर विकास विभागाच्या आरक्षण सोडतीनंतर मुंबईच्या सत्तेचा हा पेच सुटणार की अधिक गडद होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


