Bhiwandi Sucide News : कशेळी खाडीत तरुणाची उडी; चार तास शोध घेऊनही पत्ता नाही

•भरती आल्याने खाडीतील शोधकार्य थांबवले; तरुणाचा मोबाईल आणि कार पुलावरच ,भिवंडी-ठाणे मार्गावरील घटना; नारपोली पोलिसांकडून तपास सुरू
भिवंडी :- भिवंडी-ठाणे मार्गावरील कशेळी खाडी पुलावरून एका 28 वर्षीय तरुणाने आज (सोमवार, 13 ऑक्टोबर) सकाळी उडी मारल्याची घटना उघडकीस आली आहे. अनुराग केसरी असे या तरुणाचे नाव असून, बचाव पथकांनी सुमारे चार तास त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा थांगपत्ता लागू शकला नाही. खाडीला भरती आल्यामुळे आणि पाण्याचा प्रवाह वाढल्याने नारपोली पोलिसांच्या आदेशावरून शोधकार्य तात्पुरते थांबवण्यात आले आहे.
कार आणि मोबाईल पुलावरच
मिळालेल्या माहितीनुसार, कशेळी भागात राहणारा अनुराग केसरी हा सकाळी आपली कार घेऊन कशेळी खाडी पुलावर आला. त्याने आपला मोबाईल आणि इतर साहित्य कारमध्येच ठेवले. त्यानंतर त्याने थेट खाडीत उडी घेतली.
या घटनेची माहिती तातडीने भिवंडी आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, नारपोली पोलीस आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
बचाव पथकांनी तब्बल चार तास खाडीत शोधमोहीम राबवली. परंतु, भरतीमुळे खाडीतील पाण्याचा प्रवाह आणि पातळी वाढल्याने अनुराग केसरीचा शोध घेणे शक्य झाले नाही. पोलिसांच्या आदेशानुसार, पुढील शोधमोहीम आता भरती ओसरल्यानंतर सुरू केली जाईल. अनुरागने हे कृत्य कोणत्या कारणामुळे केले, याचा तपास नारपोली पोलीस करत आहेत.



