Bhayandar Police News : खून करून 28 वर्षे फरार असलेला आरोपी अखेर गजाआड; भाईंदर पोलिसांची यशस्वी कामगिरी!

Bhayandar Police Latest News : 1997 सालच्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राजेंद्र पालला गुन्हे शाखा, कक्ष-1, काशीमिराच्या पथकाने पकडले.
भाईंदर :- गुन्हा केल्यानंतर कायद्याच्या हातापासून कोणीही जास्त काळ दूर राहू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तब्बल 28 वर्षांपूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा, कक्ष-1, काशीमिरा येथील पोलिसांनी मोठ्या कौशल्याने अटक केली आहे. Kashmira Police 1997 साली भाईंदर येथे एका व्यक्तीचा खून करून हा आरोपी फरार झाला होता.
काय घडले होते 1997 साली?
घटनेची पार्श्वभूमी अशी की,5 ऑक्टोबर 1997 रोजी भाईंदर पूर्वेकडील वासुदेव इंडस्ट्रियल इस्टेट येथे एका कचऱ्याच्या पिशवीवरून मोठा वाद झाला होता. आरोपी विजयसिंग आणि त्याचे दोन साथीदार यांनी बिल्डिंगवरून कचरा खाली गटारात टाकला, ज्यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या साथीदारांच्या अंगावर खराब पाणी उडले. यावरून झालेल्या भांडणात आरोपींनी धरमनाथ रामशंकर पांडे यांच्या डोक्यात बांबूने मारहाण करून त्यांना जीवे ठार मारले होते. या घटनेनंतर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील आरोपी गुन्हा केल्यापासून सतत आपली ओळख लपवत होते. या प्रकरणातील एका मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, कक्ष-1, काशीमिराच्या पथकाने तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, या पथकाने उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे तंत्रशुद्ध तपास सुरू केला. गोपनीय माहितीवरून, त्यांना आरोपी राजेंद्र रामदुलार पाल (वय 50) हा तुंगार फाटा, वसई येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे, 4 ऑगस्ट 2025 रोजी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने सापळा रचून राजेंद्र पालला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा केल्यापासून तो पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये आपली ओळख आणि अस्तित्व लपवून राहत होता.
आरोपी राजेंद्र पालला पुढील कारवाईसाठी भाईंदर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले असून, गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे, ज्यामुळे पीडित कुटुंबाला 28 वर्षांनंतर न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.


