
Bhaskar Jadhav On Aditya Thackeray 😕“विरोधी पक्षनेता नेमल्यास सरकारमधीलच सहकारी माहिती देऊन अडचणीत आणतील, ही सत्ताधाऱ्यांची भीती.” – जाधव यांचा थेट हल्ला; ‘कोकणात ठाकरेंची शिवसेनाच चालेल’ असा ठाम विश्वास
नागपूर :- विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत आणि सत्ताधारी महायुतीत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज (8 डिसेंबर) महत्त्वाचे विधान केले.
‘विरोधी पक्षनेत्या’मागे सरकारची भीती
सरकार विरोधी पक्षनेत्यावर कोणताही निर्णय का घेत नाही, यावर बोलताना भास्कर जाधव यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर टीका केली.”सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटतेय. जर विरोधी पक्षनेता दिला, तर सरकारमधीलच सहकारी त्याला माहिती देऊन आपल्याला अडचणीत आणतील अशी भीती त्यांना वाटतेय,” असा मोठा दावा भास्कर जाधव यांनी केला.
आदित्य ठाकरेंसाठी त्याग करण्याची तयारी
विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीने भास्कर जाधव यांचे नाव विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले आहे. मात्र, या पदावरून सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली.”तरीही सरकारने आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी दाखवली, तर त्यांच्यासाठी एका क्षणात मी त्याग करेन,” असे मोठे विधान भास्कर जाधव यांनी केले.
नाराजी आणि स्पष्टवक्तेपणा
आपण नाराज असल्याच्या येणाऱ्या बातम्यांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “मी माझ्या राजकीय जीवनात कुठल्याही कारणासाठी नाराजी व्यक्त केलेली नाही. मी एकदा शब्द दिला की तो पूर्ण करण्यासाठी काहीही किंमत मोजायला तयार असतो. माझ्या 43 वर्षांच्या राजकीय प्रवासात मी कधी कुणाकडे कुठलीही गोष्ट मागितली नाही. जर चुकीचं काही असेल, तर मी त्याविरोधात बोलताना कुणताही मुलाहिजा राखत नाही.”उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याबद्दल त्यांनी केवळ आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकणातील स्थितीवर विश्वास
कोकणातील राजकीय परिस्थितीवर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, “कोकणातील स्थितीचे वास्तव स्वीकारले पाहिजे. त्या ठिकाणी शिवसेनेत दोन भाग झाले. भाजप सोबत होते तेव्हा त्यांनी पण शिवसेनेला पोखरलं. विरोधकांचे रोज पक्ष प्रवेश होतायत, तरीही ठाकरेंची शिवसेना संपणार नाही.” आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


