महाराष्ट्र
Trending

Babasaheb Patil : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सोडले गोंदियाचे पालकमंत्री पद; ‘तब्येतीचे कारण’ की पटेल यांच्या टीकेची किनार?

Maharashtra Political Latest Update : अजित पवार यांच्या बैठकीत घोषणा; इंद्रनील नाईक गोंदियाचे नवे पालकमंत्री

मुंबई :- राज्याच्या राजकारणात आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील Babasaheb Patil यांनी आपल्याकडे असलेले गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद (Guardian Minister of Gondia) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी आता राज्यमंत्री इंद्रनील नाईक Indranil Naik हे गोंदियाचे नवीन पालकमंत्री असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या उपस्थितीत वरळी येथे झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत या बदलाची घोषणा करण्यात आली. पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक मंत्री उत्सुक असताना, पाटील यांनी पद सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तब्येतीचे कारण, पण राजकीय किनार?

बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्रीपद सोडण्यामागे तब्येतीचे कारण दिले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहे, ज्यामुळे त्यांना सातत्याने पायाचा त्रास होत आहे आणि लांबचा प्रवास करणे शक्य होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, या बदलाला राजकीय किनार असल्याचे मानले जात आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात खासदार प्रफुल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. “पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत, केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच दिसतात. तसेच तेथील स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांना सोबत घेत नाहीत,” अशी नाराजी पटेल यांनी व्यक्त केली होती. पाटील हे गोंदियाचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्यावर झालेल्या अप्रत्यक्ष टीकेमुळेच हा निर्णय घेण्यात आला का, अशी चर्चा राजकीय जाणकार करत आहेत.

विदर्भाच्या मंत्र्याकडे जबाबदारी

बाबासाहेब पाटील यांनी पद सोडल्यानंतर, इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदियाच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इंद्रनील नाईक हे विदर्भातील मंत्री असल्यामुळे त्यांना गोंदियाला भेट देणे आणि तेथील कामाचा आढावा घेणे सोयीस्कर होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

यापूर्वी पालकमंत्री पदाची चाचपणी सुरू असताना बाबासाहेब पाटील आणि हसन मुश्रीफ या दोन्ही मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले नव्हते, ज्यामुळे त्यांचा सुरुवातीपासूनच नाराजीचा सूर होता. हसन मुश्रीफ यांनीही विदर्भातील एका जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडले होते आणि आता पाटील यांनीही गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडल्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीच्या चर्चेला बळ मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0