
Mira Bhayandar Police Arrested Avinash Jadhav : पोलिसांची पहाटेची कारवाई; ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव ताब्यात
मीरा-भाईंदर | मीरा-भाईंदर शहरात अमराठी व्यापाऱ्यांच्या कथित वर्चस्वाविरोधात आणि मराठी जनतेवरील अन्यायाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज सकाळी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा मार्ग अवलंबला आहे.
मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना मोठ्या पोलिस फौजफाट्यासह त्यांच्या निवासस्थानी जाऊन ताब्यात घेण्यात आले. सध्या त्यांना काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. जाधव यांनी मोर्चा थांबवण्यास नकार देत “मराठीसाठी कोणताही गुन्हा पत्करू” अशी भूमिका घेतली होती.
जाधव यांच्यानंतर वसई-विरार परिसरातील इतर मनसे पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून, मोर्च्याच्या आयोजनावर अनिश्चिततेचं सावट पसरलं आहे. तरीही बालाजी हॉटेलपासून मिरा रोड स्टेशनपर्यंत नियोजित असलेल्या मोर्चाला मराठी संघटनांचा पाठिंबा कायम आहे.
मराठी जनतेला घर नाकारणे, भाषेला दुय्यम वागणूक देणे आणि विशिष्ट समाजाच्या नावाने शहरात तणाव निर्माण होणे या प्रकारांनी मराठी समाजात तीव्र संताप आहे. त्यामुळे या मोर्चाला भावनिक आणि सामाजिक पातळीवरही मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे, तर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं आहे.


