
Avinash Jadhav On Thane Shinde Group : ‘ठाकरेंनी पदाधिकारी नेले पण मतदार नाही’; जाधव यांचा शिंदे गटावर निशाणा
ठाणे :- आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या आक्रमक नेत्यांपैकी एक असलेल्या अविनाश जाधव Avinash Jadhav यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आगामी निवडणुकीत शिंदे गटाचे ‘पाणीपत’ होणार असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. तसेच, त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणि ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरही सरकारला धारेवर धरले आहे.
प्रभाग रचनेवर आक्षेप
ठाणे महापालिकेची नुकतीच जाहीर झालेली प्रारूप प्रभाग रचना 2017 ची ‘कॉपी पेस्ट’ असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. ते म्हणाले की, “अधिकारी कोणतीही मेहनत न घेता तीच प्रारूप रचना घेऊन आले आहेत. घोडबंदरसारख्या भागात प्रचंड नागरीकरण वाढले असतानाही तेथील नगरसेवकांची संख्या वाढलेली नाही.” ‘प्रारुप रचना जशीच्या तशी ठेवली, फक्त मतपेट्या तशाच ठेवू नका, तेवढे उपकार आमच्यावर करा,’ अशा शब्दांत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर टीका केली.
वाहतूक कोंडी आणि इतर प्रश्न
ठाण्यातील वाहतूक कोंडी हा निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा असेल असे जाधव यांनी स्पष्ट केले. “ठाण्याहून फाउंटनला जाण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. ठाण्याहून अंबरनाथला साडेतीन तास लागतात. मेट्रोची कामे ठप्प आहेत,” असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच, पाण्याच्या धरणाचा आराखडा तयार झाल्यानंतर नगरसेवकांनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर जागा खरेदी करून भाव वाढवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
शिंदे गटाचे ‘पाणीपत’ का?
शिंदे गटावर हल्लाबोल करताना अविनाश जाधव म्हणाले की, “शिंदे गटाला त्यांचा मतदारच माहीत नाही.” शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी एकट्याने निवडणूक लढवलेली नाही. ‘शिंदे यांच्यासोबत असलेला मतदार हा भाजपचा तर नाही ना?’, असा सवाल करत ते म्हणाले की, “शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक आणि पदाधिकारी नेले, पण मतदार घेऊन जाऊ शकले नाहीत.” हाच मुद्दा आगामी निवडणुकीत शिंदे गटासाठी मोठा धक्का ठरेल आणि त्यांचे पाणीपत होईल, असा विश्वास अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.


