ठाणेमुंबई
Trending

Avinash Jadhav : राज ठाकरेंनी दिलेला शब्द मनसेने पाळला! डोंबिवलीत एकता सावंत यांचा हक्काचा शॉरमा स्टॉल दिमाखात सुरू

Ekta Sawant Reel star Dombivli News : अविनाश जाधव यांच्या हस्ते उद्घाटन; पालिकेच्या कारवाईनंतर रिलस्टार एकता सावंत यांना मिळाला ‘मनसे’ आधार

डोंबिवली | कष्टकरी मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहण्याची आपली परंपरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा जपली आहे. डोंबिवलीतील प्रसिद्ध मराठी व्यावसायिक एकता सावंत यांच्या शॉरमा स्टॉलवर महापालिकेने कारवाई केल्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पुढाकार घेऊन 4 फेब्रुवारी रोजी एकता सावंत यांना त्यांचा हक्काचा स्टॉल मिळवून दिला. या स्टॉलचे उद्घाटन स्वतः अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

नेमका वाद काय होता?

रिलस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेल्या एकता सावंत या डोंबिवलीत शॉरमा विक्रीचा व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) त्यांच्या स्टॉलवर कारवाई केली होती. “रोज 300 रुपये हप्ता देऊनही केवळ माझ्यावरच कारवाई का?” असा सवाल करत एकता यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपली कैफियत मांडली होती. पालिकेचे अधिकारी इतर फेरीवाल्यांना पाठीशी घालत असून केवळ मराठी व्यावसायिकाला त्रास देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

राज ठाकरेंची दखल आणि अविनाश जाधवांची एन्ट्री

एकता सावंत यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल थेट राज ठाकरे यांनी घेतली. राज ठाकरेंच्या आदेशानुसार अविनाश जाधव तातडीने डोंबिवलीत दाखल झाले. यावेळी एकता सावंत यांनी भावूक होत, “दादा, मला इथे टपरी टाकून द्या आणि त्यावर राज साहेबांचा फोटो लावा, म्हणजे मला इथून कोणीही हटवू शकणार नाही,” अशी मागणी केली होती. त्यावर “तुला साहेबांनीच भेटायला पाठवले आहे, आता काळजी करू नको,” असा शब्द जाधवांनी दिला होता.

‘विकासाचे नाव अविनाश जाधव’

अवघ्या काही दिवसांतच अविनाश जाधव यांनी शब्द पूर्ण केला आणि एकता सावंत यांना सर्व सोयींनी युक्त असा नवीन शॉरमा स्टॉल मिळवून दिला. या स्टॉलवर एकता यांच्या इच्छेनुसार राज ठाकरे यांचा मोठा फोटोही लावण्यात आला आहे. “खूप मदत केली तुम्ही, धन्यवाद. राज साहेबांची मी खूप आभारी आहे,” अशी पोस्ट करत एकता यांनी मनसे नेतृत्वाचे आभार मानले आहेत.
मराठी व्यावसायिकांना बळ
या घटनेमुळे डोंबिवलीतील मराठी व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. “मराठी माणसाने व्यवसायात उतरले पाहिजे आणि त्यांना कोणी त्रास दिला तर मनसे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,” असा संदेश या निमित्ताने अविनाश जाधव यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0