Atharva Salvi : रत्नागिरीत शिंदेसेनेकडून राजन साळवींच्या मुलाला ‘डावलले’! अथर्व साळवी यांचे भावनिक पत्र व्हायरल

•प्रभाग 15 मध्ये उमेदवारी नाकारल्याने साळवींना मोठा धक्का; ‘राजकारण बदलेल, पण नातं कायम’, भावनिक स्टेटसने रत्नागिरीत खळबळ
रत्नागिरी :- रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे (शिंदे गट) नेते तथा माजी नगराध्यक्ष राजन साळवी यांना त्यांच्याच पक्षाकडून एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. साळवी यांचे पुत्र अथर्व साळवी यांना प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उमेदवारी नाकारल्यामुळे अथर्व साळवी यांनी रत्नागिरीकरांना लिहिलेले अत्यंत भावनिक पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.
अथर्व साळवी यांनी फेसबुक स्टेटसद्वारे ‘पक्षनिष्ठा’ या आशयाखाली आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, महायुतीच्या निर्णयामुळे आपल्याला निवडणुकीतून बाजूला व्हावे लागत आहे. मात्र, “नेतृत्व सोडत आहे पण लोकांची सेवा, तुमच्यासाठी धडपड आणि तुमच्या कामासाठी धावपळ कधीच सोडणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. “राजकारण बदलू शकतं… पदं येतात-जातात… पण नातं? ते मात्र कायम राहतं – तुमचं आणि माझं,” असे भावनिक विधान अथर्व यांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने (शिंदे गट) प्रभाग क्रमांक 15 मधून अथर्व साळवी यांच्याऐवजी ही जागा भाजपसाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच भाजपमधून एखादा उमेदवार आयात करून त्याला शिवसेनेत प्रवेश देण्याचा पर्यायही विचारात आहे. या निर्णयामुळे प्रभाग 15 मधील राजकीय समीकरणे अनिश्चित झाली आहेत.
राजन साळवी हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आले होते, मात्र त्यांच्याच मुलाला उमेदवारी नाकारल्याने स्थानिक राजकारणात या निर्णयाचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.


