Ashish Shelar : नवाब मलिक मुंबईत नेतृत्वासाठी आले तर युती नाही! भाजपचे मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांचा राष्ट्रवादीला स्पष्ट इशारा

•’मलिक यांच्या मुद्द्यावर भाजप तडजोळ करणार नाही’; फडणवीसांनी केलेल्या दाऊद कनेक्शनच्या आरोपाचा दिला संदर्भ
मुंबई :- राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये (Mahayuti) नवा पेच निर्माण झाला आहे. माजी मंत्री नवाब मलिक हे जर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मुंबईत नेतृत्व करणार असतील, तर त्यांच्याशी युती करणार नाही, अशी परखड भूमिका सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे मुंबई निवडणूक प्रभारी ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी स्पष्ट केली.
मुंबई महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जाहीर केले आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर शेलार यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) सोबतच्या युतीबाबतची भूमिका कठोरपणे मांडली. “महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व नवाब मलिक करणार असल्याचे आम्ही ऐकून आहोत. पण नवाब मलिकांच्या मुद्द्यावर भाजप कधीही तडजोळ करणार नाही,” असे शेलार यांनी ठामपणे सांगितले. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळीच मलिक यांच्याविषयीची भूमिका स्पष्ट केली होती, कारण मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व मलिक करणार असतील, तर भाजप युती करणार नाही, असे शेलार यांनी म्हटले आहे.
यापूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी नवाब मलिक यांच्यावर कुख्यात दाऊद इब्राहिमशी आर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. दाऊद हा मुंबईतील बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार असून, मलिक यांनी देशद्रोही गुन्हेगारांशी संबंध ठेवल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. याच कारणामुळे भाजपची अशी आग्रही भूमिका आहे की, मलिक यांना महायुतीच्या प्रचार सभा किंवा रथयात्रेत सहभागी करून घेतले जाऊ नये. सध्या वैद्यकीय उपचारांच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना अंतरिम जामीन दिला आहे.


