महाराष्ट्र

Amit Shah : “आगामी निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा” – अमित शहा यांचे मुंबईत भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

Maharashtra Political News : “हे फक्त कार्यालय नव्हे, तर भाजपसाठी मंदिर आहे”; महाराष्ट्रात भाजप कुबड्यांचा आधार न घेता मजबूत

मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा I Amit Shah यांच्या हस्ते आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) भव्य नूतन प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत शहा यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा ‘सुपडा साफ’ करण्याचे जोरदार आवाहन केले.

‘कार्यालय नव्हे, मंदिर’

आपल्या भाषणात अमित शहा यांनी भाजपच्या विचारधारेवर जोर दिला. ते म्हणाले, “महाराष्ट्र भाजपसाठी आजचा दिवस शुभ आहे. हे फक्त कार्यालय नसून, आमच्या पक्षासाठी एक मंदिर आहे. बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय हे फक्त काम करण्याचे ऑफिस असेल, मात्र भाजपसाठी कार्यालय म्हणजे मंदिर होय.”

ते पुढे म्हणाले की, पक्षाचे सिद्धांत आणि नीती येथे संरक्षित व संवर्धित होतात. भारत आणि भारतीय लोकांच्या हितासाठी कठोर संघर्ष करण्याची प्रेरणा या कार्यालयातून मिळते.

महाराष्ट्रात भाजप मजबूत

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शहा म्हणाले, “आता भाजप कुठल्या कुबड्यांचा आधार न घेता चालत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप हा एक मजबूत स्वाक्षरी म्हणून दिसत आहे.” त्यांनी माजी अध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

55 हजार स्क्वेअर फुटाचे कार्यालय

या भव्य कार्यालयाबद्दल बोलताना शहा यांनी समाधान व्यक्त केले. “55 हजार चौरस फुटाचे हे कार्यालय आहे. यात लायब्ररी, कॉन्फरन्स रूमसह प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांचेही कार्यालय आहे. हे कार्यालय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की येथूनच निवडून जायचे आहे.”

घराणेशाहीवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या यशाचे श्रेय देताना शहा यांनी विरोधी पक्षांमधील घराणेशाहीवर सडकून टीका केली. “मी माध्यमांना सांगतो की भारतात एकमेव भाजप हा पक्ष आहे, जिथे बुथ प्रमुख हा पक्षाचा देशाचा अध्यक्ष होऊ शकतो. आमचा पक्ष घराणेशाहीनुसार चालत नाही. ज्यामध्ये क्षमता आहे तोच याठिकाणी मोठा नेता होतो. या देशात घराणेशाही चालणार नाही, तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावा लागेल, हे आम्ही सिद्ध केले आहे.”

यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मृतींना अभिवादन केले आणि कठीण काळात पक्ष मजबूत करणाऱ्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

vivek

Recent Posts