
Ajit Pawar On Darubandi Kharghar : महानगरपालिका ठरावातून संपूर्ण दारूबंदी शक्य नाही
मुंबई | “खारघर परिसरातील दारूविक्रीच्या अनुज्ञप्त्या रद्द करून तो भाग ‘दारूमुक्त’ घोषित करावा”, या मागणीवर विधानसभेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
त्यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या ठरावाने संपूर्ण शहरामध्ये दारूबंदी लागू करणे शक्य नाही, मात्र एखाद्या वार्डमध्ये विहित नियमांनुसार नागरिकांनी लेखी निवेदन दिल्यास आणि बहुमताने दारूबंदीच्या बाजूने मतदान झाले, तर त्या भागात दारू विक्री थांबवता येऊ शकते.
काय आहे नियमावली?
सन 2008 व 2009 च्या अधिसूचनेनुसार, नगर परिषद अथवा महानगरपालिका क्षेत्रातील एखाद्या वार्डातील 25 टक्क्यांपेक्षा कमी नसलेल्या महिला मतदारांनी लेखी मागणी केली, तर जिल्हाधिकारी गुप्त मतदान घेऊ शकतात. जर त्या मतदानात 50% हून अधिक नागरिकांनी किंवा महिला मतदारांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान केलं, तर सरकार त्या भागात मद्यविक्री बंद करू शकते, असे अजित पवार यांनी विधानसभेत स्पष्ट केलं.
स्थलांतर, नव्या परवान्यांवरही निर्बंध
राज्य सरकारने 1972 पासून नवीन मद्यविक्री अनुज्ञप्त्यांना स्थगिती दिली असून, फक्त स्थलांतराच्या आधारे परवानग्या दिल्या जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.“कोणीच दारू पिऊ नये हे वैयक्तिक मत असले तरी, दारूबंदीच्या निर्णयात व्यावहारिक अडचणीही असतात,” असे सांगत त्यांनी सांगितले की, काही जिल्ह्यांमध्ये दारूबंदी असूनही तेथील लोक इतर जिल्ह्यांतून दारू आणतात आणि विक्री करतात.
अजित पवार म्हणाले, “प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य आहे, पण स्थानिक नागरिकांनी नियमांनुसार मागणी केल्यास सरकार ती नाकारणार नाही. मात्र नियमांचे पालन अनिवार्य आहे.”
त्यामुळे आता खारघरमधील नागरिक, विशेषतः महिला मतदार, नियमांची योग्य प्रक्रिया राबवून जर ठोस मागणी करतात, तर दारूमुक्त खारघर हे स्वप्न साकार होऊ शकते.



