Ajit Pawar : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बीडमध्ये ध्वजारोहण

Ajit Pawar At Marathwada : निजामविरुद्धचा लढा हा धैर्याचा वारसा; स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील संघर्षाला अभिवादन
बीड :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बीड येथील पोलीस मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी या स्वातंत्र्य लढ्यातील वीर हुतात्म्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याचा वारसा हा धैर्य, शौर्य आणि संघर्षाचा वारसा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.


‘हा स्वातंत्र्य लढा अभिमानाचा वारसा’
आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले की, “निजामविरुद्धचा हा लढा जनतेने स्वतःच्या हिमतीवर लढला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या या लढ्यात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग होता. हा लढा आपल्यासाठी अभिमानाचा वारसा आहे.” या लढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाला त्यांनी आदराने वंदन केले.
बीडच्या विकासाचा निर्धार
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, “बीड विमानतळ, सीआयआयआयटी आणि बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेसारख्या विकासकामांना आम्ही गती देत आहोत. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.”
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आले. तसेच, पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी आणि नगर परिषदेसाठी नव्याने खरेदी केलेल्या वाहनांचे लोकार्पणही अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.



