
Air India Plane Crash Ahmedabad : “फोन वाजतोय… पण उचलत नाही,” — कुटुंब अजूनही आशावादी
बदलापूर | अहमदाबादहून लंडनकडे झेपावणाऱ्या विमानाच्या भीषण दुर्घटनेने देशाला हादरवून टाकले असतानाच बदलापूर येथील दीपक पाठक या सहवैमानिकाचे नाव समोर येताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र दीपक यांचा मोबाईल अजूनही सुरू असल्याने त्यांच्या परिवारात आशेचा किरण कायम आहे.गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडिया कंपनीचे विमान कोसळले. या अपघातात 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातात दीपक पाठक हे सहवैमानिक म्हणून कार्यरत होते, अशी माहिती समोर येताच त्यांचे कुटुंबीय सुन्न झाले. माध्यमांशी बोलताना त्यांची भावना अगदी स्पष्टपणे व्यक्त झाली — “आमचा दीपक अजूनही आमच्यात आहे, याची आम्हाला आशा आहे. त्याचा फोन वाजतोय… रिंग जातेय… पण उचलला जात नाही. तो जिवंत आहे असंच आम्ही मानतोय. जोपर्यंत अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही.”
दीपक गेली अकरा वर्षं एअर इंडियामध्ये कार्यरत असून प्रत्येक वेळेस घरी फोन करूनच तो प्रवासाला निघतो, असेही त्यांच्या घरच्यांनी सांगितले. “आजही त्याचा कॉल आला होता… त्यामुळे आम्ही अजूनही ताणलेलं श्वास रोखून, एका सकारात्मक बातमीची वाट पाहत आहोत.”


