मुंबई

Abu Azmi : अबू आजमी यांच्या वक्तव्याने पंढरपूर वारीवरून वादाचा भडका!

फडणवीस, शिवसेना आणि भाजपच्या आध्यात्मिक आघाडीची तीव्र प्रतिक्रिया

मुंबई | पंढरपूर वारी आणि पालखी यात्रेबाबत समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आजमी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपची आध्यात्मिक विंग यांनी जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “अबू आजमी यांना वादग्रस्त विधानं करून प्रसिद्धी मिळवण्याची सवय आहे. मात्र, मी त्यांना प्रसिद्धीयोग्य समजत नाही, म्हणून त्यांच्या विधानाला उत्तर देण्याचीही गरज वाटत नाही.”

शिवसेना नेते कृष्णा हेगडे यांनीही आजमी यांच्यावर टीका करताना स्पष्ट केलं की, “त्यांचे वक्तव्य हिंदू आणि सनातन धर्मविरोधी आहे. देश फक्त हिंदुस्थानचाच आहे, कोणत्याही धर्माची मक्तेदारी नाही. पंढरपूर वारीसारख्या श्रद्धास्थळावर वक्तव्य करणं चुकीचं आहे.”

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे नेते आचार्य तुषार भोसले यांनी कठोर भाषेत संताप व्यक्त करत म्हटले, “अबू आजमी हा हरा साप आहे, त्याला कंबरावर लाथ मारून पाकिस्तानला पाठवायला हवं! आमच्या पवित्र वारीला ट्रॅफिक जाम म्हणण्याचा अधिकार त्याला कोणी दिला?”

या वादाचा उगम सोलापूर येथे दिलेल्या अबू आजमी यांच्या वक्तव्यामुळे झाला. ते म्हणाले होते की, “वारीमुळे ट्रॅफिक जाम होतो, पण तरीही मुस्लिमांनी कधीही त्याचा विरोध केला नाही. मात्र मशिदीबाहेर नमाजबाबत नेहमी अडथळे निर्माण होतात.” या विधानानंतर आता वारीच्या निमित्ताने धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत आजमी यांच्यावर चहुबाजूंनी हल्ला चढवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0