Aaditya Thackeray : मुंबई पाण्यात, जबाबदारी कुणाची?” – आदित्य ठाकरेंची सरकारवर घणाघाती टीका
नुकसानभरपाई ही राज्य सरकारच्या तिजोरीतून द्या,” ठाकरेंचा स्पष्ट इशारा
मुंबई :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरांप्रमाणे मुंबईलाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पावसामुळे मुंबईतील घरं आणि दुकानं पाण्याखाली गेल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली. “महापालिकेची तिजोरी रिकामी केली आहे, त्यामुळे आता जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी,” असा ठाम सूर त्यांनी व्यक्त केला.
“मे महिन्यातही असाच पाऊस झाला होता आणि त्यावेळी साकीनाका, अंधेरी परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. तरीही कोणतीही पूर्वतयारी सरकारकडून दिसली नाही. कालही तीच स्थिती, तीच बेजबाबदारी,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप केले.
तसेच, “या राज्यात सरकार आणि प्रशासन अस्तित्वात आहे का? फक्त सत्तासंघर्ष आणि जिल्हावाटप यावरच लक्ष केंद्रित आहे. जनता मात्र दरवर्षी या पावसात बुडते आहे,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुंबईसारख्या महानगरात वर्षानुवर्षे अशीच परिस्थिती उद्भवत असेल, तर राज्य सरकारने नागरिकांसमोर जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी ठाम भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली आहे.



