“रुसून बसलेली सूनबाई आणि दिल्लीचे सासरे”; मुंबईच्या महापौरपदावरून संजय राऊतांची महायुतीवर बोचरी टीका

•गटनोंदणी रखडल्याने महापौरांची निवड लांबणीवर; भाजपने शिंदेंना वाऱ्यावर सोडल्याचा राऊतांचा दावा; ‘नॉट रिचेबल’ नगरसेवकांवरूनही साधला निशाणा
मुंबई l मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागून अनेक दिवस उलटले तरी अद्याप नव्या महापौरांच्या निवडीचा मुहूर्त सापडलेला नाही. महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव झाल्याने चुरस वाढली असतानाच, आता ही निवड थेट फेब्रुवारी महिन्यात जाण्याची शक्यता आहे. या विलंबावरून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर आपल्या खास शैलीत जोरदार टीका केली आहे.
“गटस्थापना घटस्थापनेपर्यंत होईल का?”
महायुतीने अद्याप कोकण आयुक्तांकडे आपल्या गटाची अधिकृत नोंदणी केलेली नाही. यावर बोलताना राऊत म्हणाले की, “भाजप आणि शिंदेंच्या सेनेची गटस्थापना झालेली नाही. हे बहुतेक घटस्थापनेपर्यंत गट स्थापन करतील.” मुंबईच्या महापौराची खुर्ची मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांत अंतर्गत कलह सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले.
शिंदेंची तुलना ‘रुसलेल्या सूनबाई’शी!
एकनाथ शिंदे आणि भाजपमधील वितुष्टावर भाष्य करताना राऊत यांनी उपहासात्मक टीका केली. “एकनाथ शिंदे आणि भाजपचे काही जुळत नाहीये. तिकडे शिंदे रुसून बसले आहेत. रुसून बसलेल्या सूनबाईसारख्या ते वारंवार दिल्लीत फेऱ्या मारत आहेत, पण दिल्लीचे सासरे (केंद्रातील नेते) काही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे या ‘नववधू’ची मोठी अडचण झाली असून आता ‘करे तो क्या करे’ असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
भाजपची भूमिका ‘माझं ते माझं, तुझं ते माझ्या बापाचं’
बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा (शिंदे गट) महापौर व्हावा, अशी शिंदेंची इच्छा असली तरी भाजप त्यांना जुमानत नसल्याचा दावा राऊतांनी केला. “भाजपची एकच भूमिका असते, ‘माझं ते माझं आणि तुझं असेल तेही आमच्या बापाचं’. त्यामुळे शिंदे गटाला मुंबईत काहीही मिळणार नाही, हे स्पष्ट आहे,” असेही ते म्हणाले.
नॉट रिचेबल नगरसेवकांसाठी ‘लापता’चे पोस्टर्स!
ठाकरे गटाचे काही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असून ते ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या चर्चांवर राऊतांनी उपहासात्मक उत्तर दिले. “आम्ही आता कल्याण-डोंबिवलीत, भाजपच्या आणि शिंदेंच्या कार्यालयाबाहेर ‘लापता’चे पोस्टर्स लावू. ‘यांना आपण पाहिलेत का?’ अशा आशयाचे हे पोस्टर्स असतील आणि गरज पडल्यास पोलिसांत गुन्हाही दाखल करू,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची खिल्ली उडवली.
मुंबईच्या महापौरपदाचा पेच आता चिघळताना दिसत असून, सत्तेच्या या वाटपावरून महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत.



