मुंबईठाणे
Trending

Maharashtra News : ‘मंत्रालयात लक्ष्मीदर्शन, झिरवळ राजीनामा द्या!’; लाचखोरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शनं

Mumbai Minster Session Latest News : अधिवेशनाचा दुसरा दिवस भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गाजला | ‘फाईल हलते पैशाने, मंत्रालय चालते हफ्त्याने’ म्हणत विरोधकांची सरकारवर टोलेबाजी

मुंबई :- मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचलेल्या लाचखोरीच्या प्रकरणावरून आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना पकडल्यानंतर, विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे विधीमंडळ परिसर दणाणून गेला होता.

‘मंत्रालयात एकच हिरवळ, नाव त्याचं झिरवळ’

आज सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले होते. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रमुख आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला. यावेळी विरोधकांनी “मंत्रालयात लक्ष्मीदर्शन, झिरवळ राजीनामा द्या”, “फाईल हलते पैशाने, मंत्रालय चालते हफ्त्याने” आणि “भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो” अशा आशयाचे फलक दाखवून सरकारची कोंडी केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धाड टाकली होती. एका प्रलंबित फाईलच्या मंजुरीसाठी एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. मंत्र्यांच्या थेट दालनातच हा व्यवहार होत असल्याने भ्रष्टाचाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याबाबत मोठी खळबळ उडाली आहे.

नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्या – विजय वडेट्टीवार

यावेळी माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “राज्याचा कारभार जिथून चालतो, त्या मंत्रालयात मंत्र्यांच्या नाकाखाली लाच घेतली जात आहे. मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय खालचा कर्मचारी एवढं मोठं धाडस करूच शकत नाही. हे सरकार भ्रष्टाचारात बरबटलेलं आहे. नरहरी झिरवाळ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू.”

सरकारची बचावात्मक भूमिका

विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. “या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही,” असे आश्वासन सरकारकडून देण्यात येत आहे. मात्र, विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांतही सरकारची गोची होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0