Vasai Crime News : “आत्या ओरडल्याचा राग मनात धरला अन्…; 15 वर्षांच्या भाच्याने मित्राच्या मदतीने केला सख्ख्या आत्येचा गेम!”

Vasai Latest Murder News : वसईतील खळबळजनक हत्याकांड अवघ्या 2 तासांत उघड; रक्ताचे डाग आणि बाहेरून लावलेल्या स्क्रूड्रायव्हरने उघडले हत्येचे गुपित
वसई | वसईच्या बऱ्हाणपूर उमेळमान गावात एका 60 वर्षीय महिलेची तिच्याच राहत्या घरात निर्घृण हत्या झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकरणाचा छडा लावण्यात माणिकपूर पोलिसांना अवघ्या दोन तासांत यश आले असून, धक्कादायक बाब म्हणजे या हत्येचा सूत्रधार मृत महिलेचा अवघा १५ वर्षांचा सख्खा भाचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात त्याला त्याच्या 16 वर्षांच्या एका मित्राने साथ दिली. Vasai Latest Murder News
असा उघड झाला थरार
बऱ्हाणपूर येथील ‘भिमाई’ बंगल्यात दुर्गा संजय बनसोडे (60 वय) या एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा वालीव येथे वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळपासून दुर्गा फोन उचलत नसल्याने मुलाला संशय आला. रात्री जेव्हा त्याने घरी येऊन पाहिले, तेव्हा हॉलमध्ये रक्ताचे डाग दिसले. घाबरलेल्या मुलाने तातडीने पोलिसांना बोलावले. बेडरूममध्ये दुर्गा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
नियोजनपूर्वक हत्येचा कट
घटनेचा तपास करताना पोलिसांना अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्या. बेडरूममधील बेडची गादी काढलेली होती आणि बेड उघडलेल्या अवस्थेत होता. तसेच, बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून चक्क ‘स्क्रूड्रायव्हर’ लावून तो अडकवण्यात आला होता. यावरून ही हत्या नियोजनपूर्वक केल्याचा पोलिसांना संशय आला.
कारणांचा शोध: क्षुल्लक ओरडण्याचा घेतला सूड
माणिकपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि दोन तासांत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. मृत दुर्गा या आपल्या भाच्याला काही कारणावरून ओरडल्या होत्या. या क्षुल्लक ओरडण्याचा राग 15 वर्षांच्या मुलाने मनात धरला होता. याच रागातून त्याने आपल्या 16 वर्षांच्या मित्राला सोबत घेतले आणि स्वतःच्या सख्ख्या आत्येचा काटा काढला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, हत्येसाठी नेमकी कोणती शस्त्रे वापरली आणि चोरीच्या उद्देशानेही काही कृत्य केले आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. स्थानिक नगरसेविका प्रमिला पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन या घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



