क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Wagle Crime Branch : “वागळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! मोठ्या भाड्याचे आमिष दाखवून वाहने हडपणाऱ्या भामट्यास अटक; 2.44 कोटींची 32 वाहने जप्त”

Thane Wagle Police Latest News : नवी मुंबई, पुणे, संभाजीनगरसह राज्याच्या विविध भागांतून वाहने जप्त; आरोपी संदीप शेट्टीचे कारस्थान उघड

ठाणे | वाहन मालकांना अधिकच्या मासिक भाड्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गजाआड करण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिट क्र.-5 ला मोठे यश आले आहे. संदिप रघु शेट्टी (38, रा. उलवे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 2 कोटी 44 लाख 15 हजार रुपये किमतीची 32 विविध चारचाकी वाहने जप्त केली आहेत. Thane Latest Crime News

असे उघड झाले कारस्थान
या प्रकरणाची सुरुवात 5 फेब्रुवारी 2026 रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यापासून झाली. फिर्यादी यांची पाच वाहने संदीप शेट्टी याने मासिक भाड्यावर देण्याचे सांगून ताब्यात घेतली होती. मात्र, त्यानंतर त्याने कोणतेही भाडे दिले नाही आणि वाहनेही परत केली नाहीत. उलट, त्याने ही वाहने मालकांना न कळवता परस्पर इतर व्यक्तींकडे गहाण ठेवून त्यांचा अपहार केला. गुन्ह्याची नोंद होताच आरोपी स्वतःची ओळख लपवून फरार झाला होता.

तांत्रिक तपासाने लावला छडा

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले आणि पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 6 फेब्रुवारी रोजी संदीप शेट्टीला उलवे येथून बेड्या ठोकण्यात आल्या.

राज्यात पसरले होते फसवणुकीचे जाळे

आरोपी शेट्टीची कसून चौकशी केली असता, त्याने अशा प्रकारे अनेक जणांना गंडवल्याचे समोर आले. पोलिसांनी तपास करत नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण आणि परभणी अशा विविध ठिकाणांहून 32 वाहने हस्तगत केली आहेत. जप्त केलेल्या वाहनांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

गुन्हे शाखा घटक-5 मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, हवालदार विजय काटकर, रोहिदास रावते आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अधिक भाड्याच्या आमिषाला बळी पडून आपली वाहने अनोळखी व्यक्तींच्या ताब्यात देताना नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0