Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय! अजितदादांच्या निधनामुळे यंदा वाढदिवस साजरा करणार नाही

•”मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे”; पुष्पगुच्छ व सोहळे टाळण्याचे कार्यकर्त्यांना नम्र आवाहन
मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्याप धक्क्यातून सावरलेला नाही. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. अजितदादांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेल्या दु:खाच्या सावटाखाली कोणताही उत्सव न करण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.
मैत्री आणि कर्तव्याची जाणीव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “अजितदादांच्या अपघाती निधनामुळे साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वैयक्तिकरित्या मी माझा एक अत्यंत जवळचा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी कधीही भरून येणारी नाही. या वेदनेतून महाराष्ट्र अजून बाहेर आलेला नाही.”
कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना
वाढदिवसानिमित्त होणारी गर्दी आणि सोहळे टाळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
पुष्पगुच्छ व भेटी नकोत : कार्यकर्त्यांनी, पक्षनेत्यांनी आणि नागरिकांनी कोणतेही पुष्पगुच्छ किंवा भेटी घेऊन येऊ नयेत.
सोहळ्यांना फाटा: वाढदिवसानिमित्त कोणतेही सार्वजनिक सोहळे, बॅनरबाजी किंवा उत्सव आयोजित करू नयेत.
संवेदनशीलता: पवार कुटुंबाच्या दु:खात संपूर्ण शिवसेना सहभागी असून, कार्यकर्त्यांनी संयम आणि संवेदनशीलता पाळावी.
अजितदादांना वाहिली श्रद्धांजली
अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करताना उपमुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या की, दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दु:खाच्या प्रसंगी आपण सर्वांनी मिळून पवार कुटुंबाला साथ देणे गरजेचे आहे.



