Varsha Gaikwad: “आम्ही फक्त बॅनर घेऊन गेलो होतो, बांगड्यांना एवढं घाबरता कशाला?” भाजपच्या आरोपांवर वर्षा गायकवाडांचे चोख प्रत्युत्तर

Varsha Gaikwad Latest News : राहुल गांधींचा माईक वारंवार बंद होतो, ही लोकशाही आहे का? संसदेतील गोंधळानंतर काँग्रेसची स्पष्ट भूमिका
ANI | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसकडून हल्ल्याचा कट रचला गेल्याच्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या आरोपांची हवा काढून घेतली. “माझे अर्धे आयुष्य संसदीय लोकशाहीत गेले आहे. काँग्रेस आणि महात्मा गांधींनी आम्हाला अहिंसा शिकवली आहे, आम्ही हल्ला कशाला करू?” अशा शब्दांत त्यांनी आपली बाजू मांडली.
बॅनर आणि बांगड्यांचा नेमका विषय काय?
सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला खासदारांना ढाल करून पंतप्रधानांना घेरण्याचा प्रयत्न झाला. यावर स्पष्टीकरण देताना गायकवाड म्हणाल्या, “आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. आमच्या हातात फक्त बॅनर होते. आता तुम्ही म्हणताय महिला खासदार तिथे होत्या, बांगड्या होत्या; पण आम्ही बांगड्या काढून तर जाऊ शकत नव्हतो. आमच्या बांगड्यांचा आणि बॅनरचा सत्ताधाऱ्यांनी एवढा धसका का घेतला?”
राहुल गांधींचा माईक बंद केल्याचा आरोप
सभागृहातील भेदभावावर बोट ठेवताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, “निशिकांत दुबे जेव्हा बोलायला उभे राहतात, तेव्हा त्यांना पूर्ण वेळ दिला जातो. मात्र, जेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी देशाच्या सुरक्षेबद्दल किंवा चीनच्या घुसखोरीबद्दल बोलायला लागतात, तेव्हा सातत्याने त्यांचा माईक बंद केला जातो. ही कसली निपक्षपाती भूमिका?” राहुल गांधींना बोलू दिले जात नाही, म्हणूनच आम्हाला निदर्शने करावी लागली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“पंतप्रधानांनी भीती सोडून बोलावे”
संसदेत बॅनर घेऊन जाणे हा आंदोलनाचा एक भाग आहे. त्यात हिंसेचा कोणताही विचार नव्हता. संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे सांगतानाच त्यांनी सत्ताधारी पक्षाने केलेले ‘शारीरिक हल्ल्याचे’ दावे हास्यास्पद असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी केवळ एका बॅनरला घाबरून भाषण करणे टाळू नये, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.



