Girish Mahajan : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी राजकीय वादंग! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विसर पडल्याने गिरीश महाजन टीकेचे धनी

•महिला वन अधिकाऱ्याने विचारला जाब; विजय वडेट्टीवारांचा बोचरा वार – “बाबासाहेबांचे नाव घ्यायला लाज वाटते का?”
नाशिक l नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय सोहळ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने थेट कार्यक्रमस्थळीच मंत्र्यांना जाब विचारल्याने खळबळ उडाली असून, याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजवंदन सोहळ्यानंतर मंत्री गिरीश महाजन भाषण करत होते. संपूर्ण भाषणात त्यांनी एकदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख केला नाही. हे लक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या वन विभागाच्या अधिकारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला. “प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधान निर्मात्यांचे नाव घ्यायला तुम्ही कसे विसरलात?” असा थेट सवाल त्यांनी भर कार्यक्रमात केला. या अनपेक्षित प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पोलीस कारवाई आणि तक्रार
गोंधळ वाढू नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत माधवी जाधव आणि त्यांच्या सोबत असलेल्या दर्शना सौपुरे यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेले. मात्र, या घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी अनुयायी आणि नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करत मंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी केली. अखेर माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
विजय वडेट्टीवारांचा कडाडून हल्लाबोल
या प्रकरणावरून काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले की,”या मंडळींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते. मुळात संविधानाला विरोध करणारी ही विचारसरणी आहे. ज्यांना संविधान निर्मात्याचे नाव घ्यायला संकोच वाटतो, त्यांना लोकशाहीच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? हे लोकशाहीने सत्तेत आले की हुकूमशाहीने, याचे उत्तर आता जनताच मागेल.”
राजकीय वातावरण तापले
प्रजासत्ताक दिन हा संविधानाचा उत्सव असतानाच नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे भाजप बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. महायुतीमधील इतर नेत्यांनी अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, सोशल मीडियावर गिरीश महाजन यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



