मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : भगतसिंह कोश्यारींना ‘पद्यभूषण’ जाहीर होताच संजय राऊतांचा संताप; “महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते!”

Sanjay Raut On Bhagatsingh Koshari : महापुरुषांच्या अवमानावरून राऊतांचे भाजपवर टीकेचे आसूड; “संविधानाची हत्या केल्याबद्दलच हा पुरस्कार?” असा केला खोचक सवाल

मुंबई l प्रजासत्ताक दिनाच्या Republic Day पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीवरून महाराष्ट्रात आता राजकीय वादंग निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याने शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी भाजपवर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. “महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते,” अशा शब्दांत राऊतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

वादग्रस्त कार्यकाळाची करून दिली आठवण संजय राऊत यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत कोश्यारींच्या कार्यकाळातील वादग्रस्त मुद्द्यांना पुन्हा एकदा वाचा फोडली. “महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्मभूषण किताबाने सन्मानित केले आहे,” असा गंभीर आरोप राऊतांनी केला. तसेच, कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले-महात्मा फुले दाम्पत्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची आठवण करून देत, अशा व्यक्तीला सन्मानित करणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोश्यारींचा राजकीय प्रवास आणि वाद भगतसिंह कोश्यारी हे 2019 ते 2023 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यांच्या काळात ‘पहाटेचा शपथविधी’ आणि महाविकास आघाडी सरकारसोबत झालेले मतभेद प्रचंड गाजले होते. मात्र, त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठा वाद हा महापुरुषांवरील वक्तव्यांमुळे झाला होता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विवाहाबद्दल त्यांनी केलेली टिप्पणी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या विधानामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती.

भाजपचा जुना आणि विश्वासू चेहरा दुसरीकडे, भाजपने कोश्यारींच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा विचार करून या पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे दिसत आहे. कोश्यारी यांनी उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि दोन राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. राज्यपाल असताना त्यांनी गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. भाजपसाठी ते एक निष्ठावान आणि ज्येष्ठ नेते मानले जातात.

मात्र, निवडणुकीच्या वातावरणात कोश्यारींना मिळालेला हा सन्मान आता विरोधकांच्या हातात नवे राजकीय कोलीत देऊन गेला आहे. या पुरस्कारावरून आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अधिक कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0