मुंबईठाणे
Trending

Eknath Shinde : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंची घोषणांचा पाऊस! ‘आरोग्य आपल्या दारी’ सह महिलांसाठी १०० कोटींची तरतूद

Eknath Shinde On Balasaheb Thackeray Jayanti : गडकोट किल्ले होणार प्लास्टिकमुक्त; महापालिकांना ३ कोटी तर नगरपालिकांना १ कोटींचा विशेष निधी; मराठी भाषेसाठीही मोठी तरतूद

मुंबई | हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यासाठी लोककल्याणकारी योजनांची मोठी शिदोरी उघडली आहे. मुंबई महापालिकेपासून ते राज्यातील शेवटच्या नगरपालिकेपर्यंत ‘बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबवून सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केला.

‘आरोग्य आपल्या दारी’ आणि कॅशलेस उपचारांवर भर

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी’ हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांना त्यांच्या घराच्या जवळ आरोग्य सुविधा मिळतीलच, शिवाय कॅशलेस उपचारांची व्याप्ती अधिक वाढवण्यात येणार आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांचे कलम ३७० आणि राममंदिराचे स्वप्न पूर्ण केले, आता आम्ही त्यांच्या विचारांना कृतीतून पुढे नेत आहोत,” असेही शिंदे यावेळी म्हणाले.

गडकोट किल्ल्यांचे संवर्धन आणि शिवभक्तांचा सन्मान

राज्यातील गडकोट किल्ले प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या शिवभक्तांच्या स्वयंसेवी संस्थांना एक लाख रुपयांचे मानधन देण्यात येईल. किल्ल्यांवर पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय करण्यासोबतच, एसटी महामंडळाच्या माध्यमातून सवलतीच्या दरात गडकोट आणि तीर्थक्षेत्रांच्या सहलींचे आयोजन केले जाणार आहे.

महिला सक्षमीकरण आणि शिक्षण क्षेत्राला बळ

महिला बचत गट: नगरविकास विभागामार्फत महिला बचत गटांसाठी १०० कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

मुलींचे स्वसंरक्षण: राज्यातील १० हजार विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

उत्कृष्ट शाळांना बक्षिसे: महापालिका क्षेत्रातील शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी उत्कृष्ट शाळांना १० लाख, ७ लाख आणि ३ लाख रुपयांची पारितोषिके देऊन गौरवण्यात येईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांना निधीचा वर्षाव राज्यातील २९ महापालिकांना प्रत्येकी ३ कोटी रुपये आणि ३९४ नगरपालिकांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी विविध लोककल्याणकारी कामांसाठी दिला जाणार आहे. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्वतंत्र १०० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाईल. शाळांमध्ये बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करून नव्या पिढीला त्यांच्या विचारांची ओळख करून दिली जाणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0