
Samadhan Sarvankar On BJP Member : वरळी-प्रभादेवीत शिंदे सेनेला भाजपचा फटका? व्हॉट्सॲप मेसेज फिरवून कार्यकर्त्यांची दिशाभूल केल्याचा दावा; फडणवीसांकडे तक्रार करणार
मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या Mumbai BMC Election प्रभाग क्रमांक 194 (प्रभादेवी-वरळी) मधून शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार समाधान सरवणकर यांचा केवळ 500 ते 600 मतांनी निसटता पराभव झाला आहे. या पराभवाचे खापर त्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर फोडले आहे. “भाजपच्या एका विशिष्ट टोळीने माझ्या विरोधात मेसेज फिरवले आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल करून मला पाडण्याचे काम केले,” असा खळबळजनक आरोप समाधान सरवणकर Samadhan Sarvankar यांनी केला आहे.
समाधान सरवणकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली व्यथा मांडली. ते म्हणाले की, “प्रभादेवी आणि वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून मतदारांनी मला चांगली साथ दिली होती. उद्धव ठाकरेंनी स्वतः प्रत्येक बूथवर फिरून जोर लावला होता, पाच-पाच आमदार माझ्या वॉर्डात फिरत होते, तरीही मी केवळ 500 मतांनी मागे राहिलो. मात्र, या निसटत्या पराभवामागे भाजपच्या काही स्थानिक नेत्यांचा हात आहे.” सुरुवातीच्या टप्प्यात भाजपने मदत केली, पण ऐन निवडणुकीच्या वेळी “सरवणकरांना मदत करू नका” अशा आशयाचे व्हॉट्सॲप मेसेज भाजपच्या कार्यकर्त्यांना पाठवण्यात आले, असा दावा त्यांनी केला.
पराभवाचे विश्लेषण आणि ‘टोळी’चा उल्लेख: सरवणकर यांनी असाही आरोप केला की, हीच ‘टोळी’ पैसे घेऊन स्वतःच्या पक्षाचे (भाजपचे) उमेदवार पाडण्याचेही काम करते. “या टोळीमुळे लोकसभेपासून आमचे नुकसान होत असून विधानसभेलाही यामुळेच फटका बसला. ही टोळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा एकेरी उल्लेख करते,” असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे, माहीममध्ये शीतल गंभीर यांनाही याच टोळीने त्रास दिल्याचे त्यांनी नमूद केले.
समाधान सरवणकर यांनी स्पष्ट केले की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना प्रचारात पूर्ण साथ दिली, पण स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची दिशाभूल केली. या संपूर्ण प्रकाराची माहिती ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. या प्रभागात ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे विजयी झाले असून, सरवणकर यांच्या या आरोपामुळे महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे.


