
Aditya Thackeray On Coastal Road : मुंबई महापालिकेच्या 25 वर्षांतील हिशोबावरून ‘ठाकरे विरुद्ध फडणवीस’ सामना रंगला; ‘वॉटर, गटर, मीटर’वरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर प्रहार
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना (ठाकरे) आणि भाजपमध्ये जुंपली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभांमधून “केलेली विकासकामे दाखवा आणि 5 हजार रुपये मिळवा” असे आव्हान दिले होते. यावर प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना थेट कोस्टल रोडवर येण्याचे निमंत्रण दिले आहे. “मला तुमचे पैसे नकोत, ते लाडक्या बहिणींना द्या. मी तुम्हाला 6 हजार रुपये देतो, तुम्ही माझ्यासोबत कोस्टल रोडवर फिरायला चला,” असे प्रतिआव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
आर्थिक नियोजनावरून भाजपला घेरले
मुंबई महापालिकेच्या ठेवी संपवल्याच्या आरोपावर आदित्य ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, “1997 मध्ये जेव्हा आमची सत्ता आली, तेव्हा पालिकेत 600 कोटींची तूट होती. ती तूट भरून काढत आम्ही पालिकेचे आर्थिक नियोजन भक्कम केले. हे नियोजन आम्ही गेली 25 वर्षे जोपासले, पण त्या ठेवींचे तुम्ही (शिंदे-फडणवीस सरकारने) काय केले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुंबईचे ‘आरोग्य’ आणि ‘शिक्षण’ मॉडेल
आदित्य ठाकरेंनी महापालिकेच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीचा पाढाच वाचला.
जागतिक दर्जाची आरोग्यसेवा: “मुंबईची आरोग्यसेवा जगातील सर्वोत्तम आहे. स्वतःची रुग्णालये, ओपीडी आणि ट्रॉमा केअर सेंटर्स असलेले मुंबई हे एकमेव महामंडळ आहे,” असा दावा त्यांनी केला.
शिक्षण क्षेत्रात क्रांती: पालिकेच्या शाळांमध्ये 8 माध्यमांतून शिक्षण दिले जाते. सव्वातीन लाख विद्यार्थी तिथे शिकत आहेत. मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी टॅब्स दिले आणि आता परिस्थिती अशी आहे की, 4 हजार जागांसाठी 10 हजार मुले रांगेत उभी आहेत, असे आदित्य ठाकरेंनी अभिमानाने सांगितले.
“ही वॉटर, गटर आणि मीटरची निवडणूक”
महापालिका निवडणुकीचे स्वरूप स्पष्ट करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ही निवडणूक ‘वॉटर, गटर आणि मीटर’ची आहे, म्हणजेच थेट सामान्य माणसाच्या मूलभूत गरजांशी जोडलेली आहे. “भाजपवाले म्हणतात आम्ही काहीच केले नाही, पण झोपेतून उठवले तरी मी सांगू शकतो की 25 वर्षांत आम्ही मुंबईसाठी काय केले आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.



