तांदुळवाडी जि.प.शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन

कळंब (प्रतिनिधी )दि.१० जानेवारी कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी येथे आनंददायी उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्याचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष श्री.माधवराव
पाटील आणि उपसरपंच श्री.महावीर डिकले शाळेचे मुख्याध्यापक श्री.संतोष भोजने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीत भर घालण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी ने या उपक्रमाचे आयोजन केले होते.या उपक्रमांतर्गत शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या शेतातील पिकवत असलेल्या विविध फळे,भाजीपाला तसेच इतर वस्तू विक्रीस ठेवल्या होत्या. यामध्ये चिक्कू, बोरे, पेरू,ऊस यासह विविध फळे आणि मेथी, चुका,शेपू,वाटाण्याच्या शेंगा तसेच विविध भाजीपाला विक्रीस ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी संक्रातीनिमित्त महिलांना लुटण्यासाठी च्या विविध वस्तू विक्रीस ठेवल्या होत्या.
मेळाव्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे खाऊ गल्ली!!! या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व पालकांनी स्वतः तयार केलेले वेगवेगळे पदार्थ विक्रीस ठेवले होते. गावातील तरुण युवक युवती व वृद्ध आणि पालक मंडळींनी या खाऊ गल्लीला भेट देत वडापाव, पावभाजी,इडली सांबर,समोसे, भेळ, रगडा , पाणी पुरी,पॅटीस अशा विविध खाद्यपदार्थावर ताव मारला. गावातील भगिनींनी मकर संक्रांति निमित्त खरेदी करावयाच्या विविध वस्तू आणि भाजीपाला व फळे यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली .
आनंददायी मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक श्री संतोष मोहिते, श्री सयाजी शिंदे, श्रीमती रसिका आगरकर, आशा पवार तसेच स्वयंपाकी कर्मचारी सौ रुक्मिणी डिकले व मयुरी डिकले यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेतील या आनंद मेळाव्याला शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, कर्मचारी,गावातील अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस, आशा कार्यकर्ती आणि गावातील तरुण, वृद्ध, युवक ,युती, महिला या सर्वांनीच भेट देऊन या आनंददायी मेळाव्याचा आनंद घेतला. यामधून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले वेगवेगळे भाव तसेच बाजारात एखादी वस्तू विक्री करावयाची असल्यास करण्याची जाहिरात, आर्थिक व्यवहाराची देवघेव याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाल्याचे दिसून आले.


