
Uddhav Thackeray Shivsena Latest News : 18 वर्षांनंतरचे मनोमिलन पण कार्यकर्त्यांचे रणांगण; ‘मातोश्री’ आणि ‘शिवतीर्था’समोर बंडोबांना थंड करण्याचे मोठे आव्हान
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2026) तब्बल 18 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ‘मराठी अस्मिते’च्या मुद्द्यावर ऐतिहासिक युती केली. मात्र, या युतीला निवडणुकीच्या सुरुवातीलाच अंतर्गत बंडाखोरीचा मोठा फटका बसला आहे. मुंबईतील तब्बल 8 प्रभागांमध्ये मनसे आणि शिवसेना (UBT) कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त धाब्यावर बसवून एकमेकांच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. यामध्ये शिवसेनेचे 7, तर मनसेचा 1 बंडखोर उमेदवार रिंगणात उतरल्याने नेत्यांची झोप उडाली आहे.
प्रभाग 106 आणि 114 मध्ये ‘मैत्रीपूर्ण’ नव्हे, तर ‘शत्रुत्वपूर्ण’ लढत
युतीमधील सर्वात मोठा पेच प्रभाग 106 आणि 114 मध्ये निर्माण झाला आहे. प्रभाग 106 मध्ये युतीने मनसेच्या सत्यवान दळवी यांना अधिकृत उमेदवारी दिली होती, मात्र तिथे शिवसेना ठाकरे गटाचे सागर देवरे यांनी बंडखोरी करत स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, प्रभाग 114 मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या राजोल पाटील यांच्याविरुद्ध मनसेच्या अनिशा माजगावकर यांनी बंड पुकारले आहे. या दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने युतीमधील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.
माजी महापौर श्रद्धा जाधवांसमोर स्वकीयांचेच आव्हान
प्रभाग 202 मध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव यांना अधिकृत उमेदवारी मिळाली असली, तरी त्यांच्या मार्गातील अडथळे कमी झालेले नाहीत. त्यांच्याच पक्षातील विजय इंदुलकर यांनी बंडाचे निशाण फडकवत जाधव यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. “निष्ठावंतांना डावलले” असा आरोप करत इंदुलकर मैदानात उतरल्याने या हायप्रोफाईल वॉर्डाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बंडखोरीचे अन्य केंद्रबिंदू
केवळ या तीनच जागांवर नव्हे, तर इतर 5 प्रभागांमध्येही बंडखोरांनी युतीला पेचात पाडले आहे:
९५ हरी शास्त्री (शिवसेना ठाकरे गट)
१०६ सत्यवान दळवी (मनसे)
११४ राजोल पाटील (शिवसेना ठाकरे गट)
१६९ प्रवीणा मोरजकर (शिवसेना ठाकरे गट)
१९३ हेमांगी वरळीकर (शिवसेना ठाकरे गट)
१९६ पद्मजा चेंबूरकर (शिवसेना ठाकरे गट)
२०२ श्रद्धा जाधव (शिवसेना ठाकरे गट)
विजय इंदुलकर (शिवसेना ठाकरे गट)
२०३ भारती पेडणेकर (शिवसेना ठाकरे गट)
2 जानेवारीपर्यंत ‘बंडोबा’ थंड होणार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक स्तरावर संवाद साधून कार्यकर्त्यांना युती धर्माचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, “आम्ही वर्षानुवर्षे ज्यांच्याशी लढलो, त्यांच्यासाठी आता काम कसे करायचे?” असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. 2 जानेवारी 2026 ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तोपर्यंत हे बंडखोर मागे फिरले नाहीत, तर मतांच्या विभाजनाचा थेट फायदा भाजप-शिंदे महायुतीला होण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
अर्ज माघारीची अंतिम तारीख: 2 जानेवारी 2026
मतदान: 15 जानेवारी 2026
निकाल: 16 जानेवारी 2026


