Sabha Raut : ‘राष्ट्रवादी आमच्यासोबतच, वेगळ्या घोषणेची गरज नाही!’; संजय राऊतांनी जागावाटपाचा तिढा सोडवला

Sabha Raut On NCP Sharad Pawar Group : “काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या, राज ठाकरेंशी चर्चा करा”; राऊतांचा शरद पवार गटाला सल्ला
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी Mumbai BMC Election ठाकरे बंधूंची (उद्धव आणि राज ठाकरे) युती झाल्यानंतर शरद पवार Sharad Pawar गटाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शरद पवार गट नाराज असल्याच्या वावड्या उठत असतानाच, संजय राऊत Sanjay Raut यांनी आज पत्रकार परिषदेत चित्र स्पष्ट केले. “आम्ही राष्ट्रवादीसाठी जागा सोडल्या आहेत, म्हणजे युती झालेलीच आहे. आता त्याचा वेगळा ढोल पिटण्याची गरज नाही,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी युतीबाबतची साशंकता दूर केली.
जागावाटपातील पेच आणि नाराजी
जागावाटपात शरद पवार गटाच्या वाट्याला कमी जागा आल्याने कार्यकर्ते नाराज असल्याच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, “जेव्हा दोनपेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात, तेव्हा काही जागांची अदलाबदल होतेच. अशा वेळी इच्छुकांची अस्वस्थता नैसर्गिक आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना योग्य समज देतील. ज्याला अन्याय झाला असे वाटते, तो राग व्यक्त करतो, हा त्याचा अधिकार आहे.”
‘बंड’ नाही, तो व्यक्तिगत निर्णय!
पक्षातील नेत्यांच्या राजीनाम्यांवर भाष्य करताना राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. “ज्या पक्षाने 40 वर्षे सर्व काही दिले, तो पक्ष एखाद्या वेळी काही देऊ शकला नाही आणि कुणी पक्ष सोडला, तर त्याला मी ‘बंड’ म्हणणार नाही. शिंदे गटाने जे केले त्याला बंड म्हणत नाहीत, ते तर तिथे जाऊन बूट चाटत आहेत. बंडाची व्याख्या आधी समजून घ्या,” असा टोला त्यांनी लगावला.
मनसेच्या कोट्यातील जागांचा तिढा
शरद पवार गटाला हव्या असलेल्या काही जागा आता मनसेच्या वाट्याला गेल्या आहेत. यावर स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले, “आम्ही राष्ट्रवादीला स्पष्ट सांगितले आहे की, तुम्हाला हव्या असलेल्या काही जागा मनसेच्या कोट्यात आहेत, त्यामुळे तुम्ही राज ठाकरेंशी चर्चा करा. आमच्या बाजूने हा विषय आता संपलेला आहे.”
काँग्रेस-वंचित युतीचे स्वागत
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या संभाव्य युतीचेही राऊतांनी स्वागत केले. “ते आमच्यासोबत आले नाहीत तरी चालेल, पण जर ते भाजपला रोखण्यासाठी आणि त्यांचा पराभव करण्यासाठी हातभार लावणार असतील, तर आम्ही नक्कीच त्याचे स्वागत करू. आम्ही नतद्रष्ट नाही,” असे त्यांनी नमूद केले.



