Mumbai News : कबुतरांना दाणे टाकणे पडले महागात! दादरमधील व्यापाऱ्याला कोर्टाने ठोठावला 5 हजार रुपयांचा दंड

•देशातील अशा प्रकारची पहिलीच शिक्षा; सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण केल्याचा ठपका
मुंबई | कबुतरांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने (BMC) कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे उल्लंघन करून दादर परिसरात कबुतरांना दाणे टाकणाऱ्या नितीन शेठ या व्यापाऱ्याला न्यायालयाने 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. वाय. मिसाळ यांनी हा ऐतिहासिक निकाल देत, सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
मुंबई महापालिकेने आणि उच्च न्यायालयाने आरोग्याच्या कारणास्तव दादरसह अनेक ठिकाणचे कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. असे असूनही, नितीन शेठ हे दादर परिसरात वारंवार कबुतरांना दाणे टाकत असल्याचे आढळून आले. स्थानिक तक्रारींनंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. व्यापाऱ्याने न्यायालयात आपली चूक कबूल केली.
न्यायालयाने काय म्हटले?
न्यायालयाने या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 223 (ब) आणि कलम 271 अंतर्गत कारवाई केली.बंदी असतानाही दाणे टाकून लोकांचे आरोग्य, जीवन आणि सुरक्षेला धोका पोहोचवणे. “अशा प्रकारची ही देशातील पहिलीच शिक्षा असून हे एक उदाहरण आहे. लोकांनी भविष्यात सार्वजनिक आरोग्याशी खेळू नये,” असे मत न्यायालयाने निकालपत्रात नोंदवले.
हायकोर्टाचीही बंदी कायम
ऑगस्ट महिन्यात मुंबई उच्च न्यायालयातही यासंदर्भात सुनावणी झाली होती. हायकोर्टाने स्पष्ट केले होते की, कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पंखांमुळे श्वसनाचे गंभीर आजार (Hypersensitivity Pneumonitis) पसरण्याची भीती असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी दाणे टाकण्यावर घातलेली बंदी योग्यच आहे.


