
Maharashtra Latest Political News : रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित पवारांची खलबतं; मुंबईत ठाकरेंना 25 जागांचा प्रस्ताव
मुंबई/पुणे | राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या आणि भविष्यात विलीनीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे, मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (SP) आणि शिवसेना (UBT) यांच्यात जागावाटपाची पहिली महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
पुण्यात ‘पवार’ पुर्नमिलनाच्या हालचाली?
पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या बैठका पार पडल्या.गुरुवारी आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘जिजाई’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यामध्ये प्रामुख्याने भाजपविरोधात एकत्र लढण्याबाबत आणि विलीनीकरणाच्या शक्यतांवर चर्चा झाल्याचे समजते. आज शरद पवार गटाचे अंकुश काकडे आणि बापूसाहेब पठारे यांनीही अजित पवारांची भेट घेतली. शरद पवार गटाने 40-45 जागांची मागणी केली आहे, तर अजित पवार गट 30 जागा देण्यावर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.
जयंत पाटील ‘मातोश्री’वर; मुंबईसाठी 25 जागांची मागणी
पुण्यात अजित पवार गटाशी जवळीक साधली जात असतानाच, मुंबईत मात्र राष्ट्रवादी (SP) शिवसेना ठाकरे गटासोबत आघाडी करण्यासाठी आग्रही आहे.राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी आज ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन तासांच्या बैठकीत मुंबई महापालिकेच्या जागावाटपावर सविस्तर चर्चा झाली.
राष्ट्रवादीने मुंबईत 25 जागांचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.”आम्ही महाविकास आघाडीचा भाग आहोत. मुंबईत काँग्रेस आणि शिवसेना हे दोन मोठे पक्ष आहेत, पण आमचाही काही भागात प्रभाव आहे. आमची चर्चा सकारात्मक झाली असून, लवकरच अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू,” असे जयंत पाटील यांनी भेटीनंतर सांगितले.
राजकीय पेच
एककीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींमुळे महाविकास आघाडीत (विशेषतः शिवसेना आणि काँग्रेसमध्ये) अस्वस्थता आहे. तर दुसरीकडे, मुंबईत जागावाटपावरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आधीच रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीने 25 जागा मागितल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.


