Nashik News : नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! दोन माजी महापौरांसह काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपच्या गळाला

•विनायक पांडे आणि यतिन वाघ यांचा भाजपप्रवेश निश्चित; 43 वर्षांची शिवसेना सोडून पांडेनी धरले ‘कमळ’
नाशिक | राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच नाशिकमध्ये महायुतीने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. उद्धव ठाकरे गटाचे अत्यंत निष्ठावान मानले जाणारे माजी महापौर विनायक पांडे आणि माजी महापौर यतिन वाघ यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे हेदेखील भाजपच्या वाटेवर असून, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा भव्य प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
43 वर्षांच्या निष्ठेला तडा; का सोडली शिवसेना?
विनायक पांडे हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, पक्ष सोडताना त्यांनी आपली खदखद व्यक्त केली. पांडे म्हणाले,
“गेल्या 43 वर्षांपासून मी शिवसेनेत रक्त आटवलं आहे. पण मागच्या निवडणुकीत माझ्या मुलाचं तिकीट कापलं गेलं. आताही माझा मुलगा इच्छुक असून मी संजय राऊत यांच्याशी बोललो, पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. इतक्या वरिष्ठ नेत्याला जर अशी वागणूक मिळत असेल, तर काय उपयोग?”
“विकास करायचा तर भाजपच पर्याय”
शिवसेना सोडताना दुःख होत असल्याचे नमूद करत पांडे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. “उद्धव ठाकरे यांच्यावर माझी वैयक्तिक नाराजी नाही, पण ज्या पद्धतीने माझ्यावर अन्याय झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले, ते पाहता आता विकास करायचा असेल तर भाजपमध्ये जाऊनच शक्य आहे. भाजपकडून आम्हाला उमेदवारी मिळेल आणि आमचा पूर्ण पॅनल भाजपमध्ये प्रवेश करत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस आणि ठाकरे गटाची कोंडी
विनायक पांडे आणि यतिन वाघ या दोन माजी महापौरांच्या जाण्याने नाशिक महापालिकेत ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणावर क्षीण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे शाहू खैरे यांच्यासारखा मोठा चेहरा भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसलाही मोठे खिंडार पडले आहे. संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांनी ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीपूर्वी नाशिकचे राजकारण तापले
नाशिक महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आतापासूनच मोठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकाच वेळी दोन माजी महापौर आणि काँग्रेसचे दिग्गज नेते गळाला लावल्याने विरोधी पक्षांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. या पक्षांतरामुळे आगामी निवडणुकीत भाजपची बाजू अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसत आहे.



